पुणे – सुधारित नागरिकत्व कायद्यावर मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. सर्व देशांच्या लोकांना सामावून घेण्यासाठी भारत ही काय धर्मशाळा आहे का? असा सवाल राज ठाकरे यांनी विचारला आहे. १३५ कोटी लोकसंख्या असलेल्या देशाला आणखी लोकांची आवश्यकता नाही, असेही त्यांनी सांगितले आहे.
राज ठाकरे म्हणाले कि, लोकसंख्येमुळे अनेक सिस्टम्स फेल गेल्या आहेत. त्यामुळे कोणत्याही धर्माचा माणूस असेल त्याला बाहेरून आपल्या देशात आणायची काय गरज आहे? आपल्या देशात जे मुस्लिम नागरिक राहतात त्यांना असुरक्षित वाटण्याचे कारण काय? सर्व लोकांना सामावून घेण्यासाठी भारत ही काही धर्मशाळा नाही. अन्य देशातून आलेल्या लोकांना हकलावून दिले पाहिजे. माणुसकीचा ठेका हा काही भारतानेच घेतलेला नाही. इकडे राहत असलेल्यांची चिंता मिटत नाही, तर बाहेरून आणखी लोकं का हवी, असा सवालही त्यांनी केला. तसेच भाजप आणि इतर राजकीय पक्ष याला हवा देत असल्याचा आरोपही राज ठाकरेंनी केला.