नवी दिल्ली : उत्तर प्रदेशात सुधारीत नागरीकत्व कायच्या (का) विरोधात झालेल्या हिंसाचारात पोलिसांनी केलेल्या अत्याचाराची चौकशी करण्याची मागणी राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाकडे कॉंग्रेसने केली आहे. कॉंग्रेसच्या या शिष्टमंडळाचे नेतृत्व राहुल आणि प्रियांका गांधी यांनी केले.
सलमान खुर्शीद, अभिषेक सिंघवी, जीतीन प्रसाद, अजयकुमार लल्लू यांचा या शिष्टमंडळात सहभाग होता. का कायद्याच्या विरोधात झालेल्या हिंसाचारात बळी पडलेल्यांच्या कारणांचा शोध आयोगाने घ्यावा, अशी मागणी या शिष्टमंडळाने केली.
या भेटीनंतर राहूल गांधी यांनी ट्विट करून याची माहिती दिली. या हिंसाचारात उत्तर प्रदेशात दोन डझनहून अधिक जणांचे मृत्यू झाले आहेत. मिरत, बिज्नोर, वाराणसी, फिरोझाबाद, संभल आणि कानपूर येथे राज्यात हिंसाचार उफाळला होता. याबाबत एक हजारापेक्षा अधिक व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.