नवी दिल्ली – भारतात सध्या करोनाची दुसरी लाट कार्यरत आहे तिचा सर्वाधिक उद्रेक 11 ते 15 मे या कालावधीत पाहायला मिळेल, पण त्यानंतर मे महिन्याच्या अखेरीला हा आलेख झपाट्याने खाली येईल, असा निष्कर्ष आयआयटी कानपूर व हैदराबादच्या वैज्ञानिकांनी मांडला आहे.
आज देशात रोज तीन लाखांच्यावर केसेस आढळून येत आहेत आणि देशातील सध्याची सक्रिय बाधितांची संख्या 24 लाख 28 हजारांवर गेली आहे. 11 मे ते 15 मे या अवधीत सक्रिय बाधितांची ही संख्या 33 ते 35 लाखांच्या घरात जाईल, असा धोक्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. गणिती सूत्रांच्या आधारे त्यांनी हा निष्कर्ष काढला आहे.
त्यांनी म्हटले आहे की, दिल्ली, हरियाना, राजस्थान या राज्यांत 25 ते 30 एप्रिल या अवधीत सर्वाधिक करोना रुग्ण आढळून येतील. महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्यांनी करोना रुग्णांच्या संख्येच्या बाबतीत आत्ताच पिक गाठला आहे.
15 मेनंतर मात्र देशातील करोना रुग्णांच्या स्थितीत नाट्यमय बदल घडून येतील आणि हे रुग्णांचे प्रमाण झपाट्याने खाली येईल. त्यांनी सूत्र मॉडेलच्या आधारे हा अंदाज वर्तवला आहे. तथापि, गणिती मॉडेलच्या आधारे करोना प्रसाराच्या बाबतीत या आधी वर्तवण्यात आलेला एक अंदाज मात्र चुकला होता. त्यावेळी 15 एप्रिलपर्यंत करोनाचा सर्वोच्च उद्रेक होईल, असे नमूद करण्यात आले होते. पण तो अंदाज खरा ठरला नाही.