नवी दिल्ली – देशाच्या 12 राज्यांमधील लोकसभेच्या एका आणि विधानसभांच्या 56 रिक्त जागांसाठी 3 आणि 7 नोव्हेंबरला पोटनिवडणुका होणार आहेत. त्यामुळे बिहारमधील रणधुमाळीबरोबरच विविध राज्यांतील पोटनिवडणुका देशातील राजकीय वातावरण ढवळून काढणार आहेत.
बिहार विधानसभा निवडणुकीसाठी तीन टप्प्यांत मतदान होणार आहे. ते वेळापत्रक काही दिवसांपूर्वी जाहीर करताना निवडणूक आयोगाने पोटनिवडणुकांबाबतचा निर्णय नंतर घेण्याचे सूतोवाच केले. त्यामुळे पोटनिवडणुकांबाबत सस्पेन्स निर्माण झाला. अखेर बिहारमधील अखेरच्या दोन टप्प्यांबरोबरच पोटनिवडणुका घेण्याचे आयोगाने जाहीर केले.
त्या पोटनिवडणुकांचा निकाल बिहारबरोबरच 10 नोव्हेंबरला जाहीर होईल. 4 राज्यांमधील विधानसभांच्या 7 जागांसाठी तूर्त पोटनिवडणुका होणार नाहीत. केरळ, तामीळनाडू, आसाम आणि पश्चिम बंगाल या राज्यांच्या विनंतीवरून तेथील पोटनिवडणुका लांबणीवर पडल्या आहेत.
विविध राज्यांतील विधानसभांच्या 54 रिक्त जागांसाठी 3 नोव्हेंबरला मतदान होईल. त्यादिवशी मध्यप्रदेशातील सर्वांधिक 28 जागांवर पोटनिवडणुकांसाठी मतदान घेण्यात येईल. त्याशिवाय, गुजरात, उत्तरप्रदेश, कर्नाटक, ओडिशा, नागालॅंड, झारखंड, छत्तिसगढ, तेलंगण आणि हरियाणातही पोटनिवडणुका होणार आहेत.
बिहारमधील लोकसभेच्या एका आणि मणिपूरमधील विधानसभेच्या 2 जागांसाठी 7 नोव्हेंबरला मतदान होईल.