मुंबई – देशातील एक लोकसभा आणि चार विधानसभा जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकांचे निकाल आज जाहीर झाले आहेत. बंगालमधील आसनसोल लोकसभा मतदार संघात टीएमसीचे शत्रुघ्न सिन्हा, तर बालीगंगे विधानसभा मतदारसंघात टीएमसीचे बाबुल सुप्रियो विजयी झाले आहेत. दुसरीकडे, बिहारमधील बोचाहान विधानसभेच्या जागेवर आरजेडीचे अमर पासवान विजयी झाले असून महाराष्ट्रातील कोल्हापूर उत्तर मतदार संघातून जयश्री जाधव विजयी झाल्या आहेत.
दरम्यान छत्तीसगडमधील खैरागड विधानसभा मतदारसंघातही काँग्रेसचे उमेदवार आघाडीवर आहेत. तर भाजपला पोटनिवडणुकीत एकही जागां जिंकता आलेली नाही.
आसनसोल लोकसभा मतदारसंघातून शत्रुघ्न सिन्हा विजयी झाले आहेत. त्यांनी भाजपच्या अग्निमित्र पॉल यांचा 2 लाख 64 हजार 913 मतांनी पराभव केला. गेल्या वर्षी बाबुल सुप्रियो यांनी राजीनामा दिल्यानंतर ही जागा रिक्त झाली होती. सुप्रियो यांनी भाजप सोडला आणि टीएमसीमध्ये प्रवेश केला.
बाबुल सुप्रियो यांनी बालीगंगे विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या किया घोष आणि मार्क्स कम्युनिस्ट पक्षाच्या सायरा शाह यांचा पराभव केला. माजी आमदार आणि राज्यमंत्री सुब्रत मुखर्जी यांच्या निधनानंतर ही जागा रिक्त झाली होती.
महाराष्ट्रातील कोल्हापूर उत्तर विधानसभेची जागा काँग्रेसने जिंकली. काँग्रेसच्या जयश्री जाधव यांनी भाजपच्या सत्यजित कदम यांचा तब्बल 19 हजार मतांनी पराभव केला. डिसेंबर २०२१ मध्ये काँग्रेसचे आमदार चंद्रकांत जाधव यांचे कोविडमुळे निधन झाल्याने ही जागाही रिक्त झाली होती. त्यामुळे येथे पोटनिवडणूक झाली. या जागेवर 15 उमेदवार आपले नशीब आजमावत होते.