मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नव्या संसद भवनाचे उद्घाटन येत्या रविवारी केले जाणार आहे. यासाठी जय्यत तयारी देखील करण्यात आली आहे. मात्र उद्घाटन होण्याआधीच नव्या संसद भवनावरून वाद निर्माण झाला आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी यांच्या हस्ते होणाऱ्या या उद्घाटनाला विरोध केला आहे. तर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी देखील राहुल गांधी यांना पाठिंबा देत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांना डावलून नव्या संसद भवनाचे उद्घाटन केले जात आहे, याला आमचा विरोध असल्याचे म्हंटले आहे.
नव्या संसद भवनाच्या उद्घाटनाला भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना निमंत्रण नसल्याची माहिती समोर आली आहे. यावरून संजय राऊतांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. “नव्या संसद भवनाच्या उद्घाटनाला राष्ट्रपतींनाच निमंत्रण नसेल तर ही बाब गंभीर आणि हास्यास्पद आहे. संसदभवनाचचे उद्घाटन देशाच्या राष्ट्रपतींच्याच हस्ते झाले पाहिजे. पंतप्रधान, लोकसभेचे अध्यक्ष नंतर येतात.” असे म्हणत राऊत यांनी मोदींवर टीका केली आहे.
पुढे राऊत म्हणाले की, “राष्ट्रपतींना डावलून संसदचे उद्घाटन केले जात आहे, ही लोकशाहीसाठी चिंतेची गोष्ट आहे. काँग्रेसची भूमिका ही देशाची भूमिका आहे. राष्ट्रपतीचा गेल्या नऊ वर्षांत वारंवार अपमान होत आहे. अन्यायाविरोधात आवाज उठवणार नाहीत, प्रश्न विचारणार नाहीत, जाब विचारणार नाहीत, अशा लोकांनाच राष्ट्रपती पदावर गेल्या दोन कालखंडात बसवले जात आहे.”
“या देशाची संसद अजून 100 वर्षे चालली असती. आपल्यापेक्षाही जुन्या इमारती जगामध्ये आहेत. पण आपल्याकडे फक्त एका राजकीय हव्यासापोटी आणि हा नवा इतिहास मी घडवला. मी दिल्ली नवी घडवली असे दाखवण्यासाठी लाखो करोडो रुपये खर्च करून, लोकांच्या पैशांचा चुराडा करून ही नवी वास्तु कोरोना काळात उभी केली,” असेही संजय राऊत म्हणाले.
काय म्हणाले होते राहुल गांधी?
स्वातंत्र्य वीर सावरकर यांच्या जयंतीच्या दिवशी नव्या संसद भवनाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते केले जाणार आहे. या प्रकाराला विरोध करत नव्या संसद भवनाचं उद्घाटन राष्ट्रपतींच्या हस्ते झाले पाहिजे, पंतप्रधानांच्या नाही, असं राहुल गांधी यांनी म्हटलं होते.