संतोष कोकरे
सातारा – सातारा शहरातील जागांच्या किमती गगनाला भिडत चालल्या असल्याने शहराच्या पश्चिमेकडील बोगद्याच्या बाहेरील आणि आसपासच्या जमिनींना मोठी मोगणी आहे. ही बाब काही दलालांच्या पथ्यावर पडली आहे. याचा फायदा घेऊन सातारा शहरातील एक पडीक पुढारी व त्याची चांडाळ चौकडी जागामालकांना नामधारी करून स्वत: खरेदी-विक्री करत आहेत. यातून करोडोंची माया या पुढाऱ्याने गोळा केली आहे.
सातारा शहराची दिवसेंदिवस वाढत चाललेली लोकसंख्या आणि वसाहतींमुळे जागा विकत घेऊन घर बांधणे सर्वसामान्य माणसाच्या आवाक्यात राहिलेले नाही. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक आयुष्यभराची कमाई लावून किंवा प्रसंगी कर्ज काढून सातारा शहराच्या आसपास असलेल्या जमिनी विकत घेणे पसंत करत आहेत. बोगद्याच्या बाहेर जकातवाडी, डबेवाडीपासून पोगरवाडी, भोंदवडे, अंबवडे या परिसरातील जमिनींचे व्यवहार सध्या जोमात सुरू आहेत.
सातारा शहराच्या राजकारणातून बाद झालेल्या एका पुढाऱ्याची टीम या व्यवहारांमध्ये सक्रिय आहे. या टीममध्ये स्थानिक पुढाऱ्यांपासून गावटग्यांचा समावेश आपल्या सोयीप्रमाणे हा पडीक पुढारी करत आहे. आर्थिकदृष्ट्या अडचणीत असलेल्या किंवा कायदेशीर बाबीत अडकलेल्या जमीनमालकांची माहिती ही टीम या पुढाऱ्याला पुरवते. हा पुढारी जिल्ह्यातील एका वजनदार नेत्याचे नाव घेऊन संबंधित जमीनमालकाला आपल्या जाळ्यात ओढतो. स्वत: कोणतीही गुंतवणूक न करता त्या जमिनीच्या व्यवहाराची सूत्रे हाती घेतो. जागांचे भाव दुप्पट, तिप्पट करून आणि जमीन मालकाला नामधारी करून स्वत: व्यवहार करतो.
अशा प्रकारे परिसरातील जमिनींचे कोट्यवधी रुपयांचे व्यवहार या दलालांच्या टीमने आतापर्यंत केले आहेत. यातून या पुढाऱ्याने व त्याच्या साथीदारांनी कोट्यवधींची माया गोळा केली आहे. आता या पुढाऱ्याने आपला मोर्चा सातारा शहराच्या सीमेवरील दरे खुर्दकडे वळविला आहे.
काही धनिकांनी गुंतवणूक म्हणून गावात खरेदी केलेल्या जमिनींचे व्यवहार त्याने स्थानिक नेत्यांच्या मदतीने या पुढाऱ्याच्या टीमने हाती घेतले आहेत. खरेदीदार मूळ मालकापर्यंत पोहोचू नये यासाठी साम, दाम, दंड, भेद यांचा पुरेपूर वापर केला जात आहे. दरम्यान, दुर्गम भागातील नागरिकांचे प्रतिनिधित्व करायची संधी या पुढाऱ्याला अपघाताने मिळाली होती. मात्र, या भागातील वंचित घटकांच्या अडीअडचणी सोडवण्यापेक्षा या महाशयाने त्यांनाच लुबाडायचा गोरख धंदा सुरू केला आहे.
पुढाऱ्याच्या टीममध्ये “काळू-बाळू’चा समावेश
साताऱ्याच्या पश्चिमेकडील ठोसेघर, कास, बामणोली या दुर्गम भागातील नागरिकांना वर्षानुवर्षे रोजगाराची पुरेशी संधी व मुलांच्या शिक्षणाच्या सुविधा नसल्याने नवीन पिढी उदरनिर्वाह आणि शिक्षणासाठी सातारा शहर, मुंबई, पुणे आणि इतर ठिकाणी स्थलांतरित झाली आहे. त्यातील बहुतांश कुटुंबे भाड्याच्या घरात अथवा झोपडपट्ट्यांमध्ये राहत आहेत.
त्यांना शहरात जागा घेऊन घर बांधणे शक्य नसल्याने तुलनेत स्वस्त असलेल्या शहराबाहेरील परिसरातील जागा विकत घेण्यास पसंती देतात. त्यापैकी काही जण नाईलाजास्तव बोगद्याबाहेरील जागा विकत घेण्यावर समाधान मानत आहेत. अशा खरेदीदारांना सावज करण्यासाठी या पुढाऱ्याने “काळू-बाळू’ची नियुक्ती केली आहे.