नवी दिल्ली – राष्ट्रवाद हीच आमच्या पक्षाची प्रमुख प्रेरणा आहे आणि गुड गर्व्हनन्स हा आमचा मंत्र आहे. त्याच आधारावर आम्ही भारताला सन 2047 पर्यंत पुर्ण विकसित देश बनवू असा निर्धार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे. ज्या दिवशी आपण भारतीय स्वातंत्र्याचे शतक साजरे करीत असू त्या दिवशी भारत विकसित देश झालेला असेल असे त्यांनी म्हटले आहे. त्याच उद्देशाने भारतीय जनता पक्षाच्या संकल्प पत्रात ठोस आणि कालबद्ध विकासाचे कार्यक्रम राबवण्यासाठी 75 नवीन संकल्प सोडण्यात आले आहेत असे ते म्हणाले.
समाजातील सर्व घटकांच्या इच्छा आकांक्षाचे प्रतिक या संकल्पपत्रात दिसून येत आहे. आम्ही एक नवा भारत निर्माण करण्याच्या प्रामाणिक प्रयत्नांत आहोत. वातानुकुलीत खोल्यांमध्ये बसून राहण्यापेक्षा आम्हाला दारिद्रयाच्या विरोधात लढा द्यायचा आहे. लोकांच्या गरजा आधी पुर्ण करून नंतर त्यांच्या अपेक्षापुर्ण करण्यावर लक्ष केंद्रीत करणार आहोत असे ते म्हणाले.