पुढच्या वर्षी देशातल्या 21 शहरांची भूजल पातळी शुन्यावर जाण्याची शक्यता
एका अहवालातून माहिती आली समोर
नवी दिल्ली : देशात वाढते तापमान आणि वेगाने घसरणारा भूजल स्तर देशासमोरचे मोठे संकट बनत चालले आहे. नीती आयोगाने काही दिवसांपूर्वी जारी केलेली आकडेवारी आश्चर्यचकीत करणारी आहे. दुसऱ्यांदा सत्तारुढ झालेल्या मोदी सरकारकडून जलशक्ती मंत्रालय स्थापन केलेले असताना ही स्थिती चिंताजनक आहे. कारण,2030 पर्यंत देशातील 40 टक्के लोकसंख्येची पिण्याच्या पाण्यासाठी मारामार होणार असल्याचे या आकडेवारीतून दिसून येत आहे.
सीएनएनच्या अहवालानुसार, पाणी व्यवस्थापनावर जर लक्ष दिले नाही तर काय होऊ शकते हे चेन्नई शहरात दिसून आले आहे. बंगळुरु, हैदराबाद त्याच मार्गावरुन जात आहेत. परिस्थिती सुधारली नाही तर 2030 पर्यंत देशातील 40 टक्के जनतेला घोटभर पाण्यासाठी संघर्ष करावा लागेल. पुढील वर्षी देशातील 21 शहरातील भूजलाची पाणीपातळी शून्य होण्याची भीती व्यक्त होत आहे.
सीएनएनच्या म्हणण्यानुसार, देशात मान्सून उशिरा येत असल्याने पिकाचे चक्र बिघडले आहे. पूर्वी जून रोजी केरळात दाखल होणारा मान्सून हळूहळू उशिरा दाखल होऊ लागला. यामुळे पेरणीचा निर्णय घेण्यास शेतकऱ्यांना अडचणी येऊ लागल्या. मान्सूनच्या काळात पाऊस न पडणाऱ्या दिवसांची संख्या वाढत आहे. भूजल स्तर वेगाने घटत आहे. 2002 ते 2016 या काळात भूजल स्तरात 10 ते 25 मिमीची घसरण झाली आहे.