मुंबई : राज्यात सध्या भाजप आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात शाब्दिक चकमक होताना दिसत आहे. त्यात भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा एकदा पहाटेच्या शपथविधीचा उल्लेख करत अजित पवारांनी शरद पवारांच्या ड्रॉवरमधून ५४ आमदारांची स्वाक्षरी असलेलं पत्र चोरल्याचा आरोप केला आहे. दरम्यान त्यांच्या या टीकेला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सडेतोड उत्तर दिले आहे.
सामना संपादकीयमधून चंद्रकांत पाटील यांच्या टीकेचा समाचार घेण्यात आला आहे. यासंबंधी विचारण्यात आले असता संजय राऊत यांनी सांगितलं की, “ते पत्र चोरण्यास कारण काय? पत्र चोरल्याचा आरोप भाजपाने केला आहे. ज्यावेळी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली तेव्हा जुनी जळमटं काढून फेकून द्यायला हवी होती. पण भाजपाचे सहकारी त्यातून बाहेर पडलेले नाहीत. त्यांच्या मनाला हा विषय फार लागला आहे”.
“चोरीचा माल विकत घेणं हा सुद्धा गुन्हा आहे. एखाद्या नेत्याने शरद पवारांच्या ड्रॉवरमधून पत्र चोरलं असेल तर त्याच्या आधारे सरकार स्थापन करणं आणि चोरीचा माल विकत घेणं हा फार मोठा गुन्हा आहे,” अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.
भाजपा नेत्यांनी शिवसेनेने विश्वासघात केल्याची टीका केली असून यावर बोलताना ते म्हणाले की, “आम्हालाही विश्वासघात केल्यानंतर वाईट वाटतंच. उद्धव ठाकरेंना भाजपाच्या प्रमुख नेत्यांनी शिवसेना प्रमुखांच्या खोलीत मुख्यमंत्रीपदाबाबत शब्द दिला होता असं उद्धव ठाकरे म्हणतात.
तो शब्द पाळला गेला नाही हा विश्वासघात असून अनैतिक आहे. ती वेदना आजही टोचत आहे. पण आम्ही विसरुन गेलो आहे. त्यामुळे भाजपानेसुद्धा पत्र, शिवसेनेने फसलं यातून बाहेर पडलं पाहिजे आणि एक विरोधी पक्ष म्हणून खंबीर नेतृत्व उभं करुन काम केलं पाहिजे”.