मुंबई – ओमायक्रॉनमुळे जागतिक परिस्थिती नकारात्मक असली तरी भारतीय अर्थव्यवस्थेबाबत गुंतवणूकदार आशावादी आहेत. विविध कंपन्यांचे ताळेबंद चमकदार असतील या आशेने गेल्या चार दिवसापासून खरेदी वाढून निर्देशांक वाढले आहेत.
बुधवारी मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 533 अंकांनी वाढून 61,150 अंकांवर बंद झाला. एक वेळ हा निर्देशांक 61,218 अंकापर्यंत वाढला होता.
राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 156 अंकांनी म्हणजे 0.87 टक्क्यांनी वाढून 18,212 अंकांवर बंद झाला.
महिंद्रा, एअरटेल, रिलायन्स इंडस्ट्रीज, आयसीआयसीआय बॅंक, टाटा स्टील या कंपन्यांच्या शेअरच्या भावात पाच टक्क्यांपर्यंत वाढ झाली. टीसीएस, टायटन, एचडीएफसी बॅंक, टेक महिंद्रा, विप्रो, नेस्ले या कंपन्यांचे शेअर विकून गुंतवणूकदारांनी नफा काढून घेतला. शेअर बाजार बंद झाल्यानंतर काही माहिती तंत्रज्ञान कंपन्या ताळेबंद जाहीर करणार होत्या. शनिवारी बॅंका ताळेबंद जाहीर करणे सुरू करणार आहेत.
याबाबत आशावादी गुंतवणूकदारांकडून बॅंका, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअरची खरेदी वाढली आहे. शेअर बाजारातील खरेदी सर्वसमावेशक होती. 19 क्षेत्रापैकी फक्त ग्राहक वस्तू आणि आरोग्य क्षेत्राचे निर्देशांक घसरले.
मिड कॅप व स्माल कॅप एक टक्क्यापर्यंत वाढले. अमेरिकेच्या फेडरल रिझर्वचे अध्यक्ष जेरोम पावेल यांनी सांगितले की, लवकरच व्याजदरात वाढ करण्यास सुरुवात केली जाणार आहे. मात्र भांडवल सुलभता कायम ठेवण्याचा विचार आहे. काल परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 111 कोटी रुपयांच्या शेअरची खरेदी केली.