पाथर्डी – पाथर्डी कृषी उत्पन्न बाजार समितीतील व्यापाऱ्यांकडून हमीभावापेक्षा कमी दराने शेतीमालाची खरेदी करून शेतकऱ्यांची लूट होत असल्याचे वृत्त दैनिक “प्रभात’ मध्ये प्रसिद्ध होताच बाजार समिती प्रशासन खडबडून जागे झाले. व्यापाऱ्यांनी हमीभावापेक्षा कमी दराने शेतीमाल खरेदी करू नये, अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल, अशा आशयाच्या नोटिसा बाजार समितीने व्यापाऱ्यांना बजावल्या आहेत.
बाजार समितीचा कारभार पारदर्शक करण्यासाठी संचालक मंडळांचा नेहमीच प्रयत्न असून शेतकऱ्यांची अडवणूक करून लूट करणाऱ्या कुठच्याच घटकाची हयगय केली जाणार नाही, अशी तंबी बाजार समितीचे सभापती बन्सीभाऊ आठरे व उपसभापती मंगलताई गर्जे यांनी दैनिक “प्रभात’शी बोलताना दिली. शासनाने ठरवून दिलेल्या हमीभावापेक्षा कमी दराने खरेदी करणाऱ्या व अन्य बाबीत व्यापाऱ्यांकडून फसवणूक होत असल्याचे लक्षात आल्यानंतर शेतकऱ्यांनी बाजार समितीकडे तक्रार करावी, तक्रारीत तथ्य आढळल्यास संबंधित व्यापाऱ्यावर फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. बाजार समितीची निर्मिती शेतकऱ्यांसाठी झाली आहे. शेतकऱ्याचे हित लक्षात घेऊनच विद्यमान संचालक मंडळ कार्य करीत आहे. शेतकऱ्यांच्या शेतीमालाला योग्य भाव मिळायला हवा यासाठी आम्ही वेळोवेळी प्रयत्नशील असतो.
शासनाने ठरवून दिलेल्या हमीभावापेक्षा कमी दराने शेतीमाल खरेदी करून, तसेच संगणमत करून शेतकऱ्यांची फसवणूक होत असल्याबाबत यापूर्वीही तक्रारी आल्या होत्या. बाजार समितीच्या संचालक मंडळाने यावर गांभीर्याने विचारविनिमय करून व्यापाऱ्यांना नोटिसा बजावल्या होत्या. मात्र सर्व व्यापाऱ्यांनी एकत्रित येऊन व्यवहार बंद ठेवले. शेतीमालाची खरेदी बंद झाल्याने शेतकरी अडचणीत आला. शेतकरी एकसंघ नसल्याने व्यापाऱ्यांचे फावते असेही त्यांनी यावेळी सांगीतले. शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये, म्हणून बाजार समितीने कायदेशीर मार्ग अवलंबिल्यास व्यापारी शेतीमालाची खरेदी बंद ठेवून शेतकऱ्यासह बाजार समितीलाही वेठीस धरत असल्याची अप्रत्यक्ष मात्र धक्कादायक कबुली पदाधिकाऱ्यांनीच दिली आहे. यावेळी तरी संचालक मंडळ काही ठोस निर्णय घेते, कागदी घोडे नाचवत शेतकऱ्यांची पिळवणूक उघड्या डोळ्यांनी पाहते हे पहावयास मिळणार आहे.
दरम्यान,बाजार समितीने भुसार व खरेदीदार व्यापाऱ्यांना बजावलेल्या नोटिशीत म्हटले आहे की, पणन संचालक महाराष्ट्र राज्य पुणे व महाराष्ट्र शासनाच्या 30 ऑगस्ट 2019 च्या निर्णयानुसार 1 सप्टेंबर 2019 पासून शेतीमाल घेताना शेतकऱ्यांचा आधार कार्ड व बॅंक पासबुक झेरॉक्स घेऊन त्यांची रक्कम रोखीने न देता चेकने किंवा आरटीजीएसने देण्यात यावी. रोख पैसे देऊ नये, तसेच शासनाने ठरवून दिलेल्या हमीभावापेक्षा कमी दराने शेतीमालाची विक्री होणार नाही,याची दक्षता घ्यावी वरील सर्व बाबींची दखल घेतली नाही तर कृषी उत्पन्नाची खरेदी – विक्री नियमन अधिनियम आपणा विरुद्ध अनुज्ञप्ती फी बाबत योग्य तो निर्णय घेतला जाईल, याची गांभीर्याने नोंद घ्यावी, या नोटिसावर बाजार समितीचे सचिव व सभापती ची स्वाक्षरी आहे.
हमीभावापेक्षा कमी दराने शेतीमाल खरेदी करून फसवणूक होणे गंभीर बाब आहे. निबंधक कार्यालयामार्फत या प्रकरणाची चौकशी करण्यात येईल. हमीभावापेक्षा कमी भावात शेतीमाल खरेदी होत असेल तसा पुरावा दिल्यास संबधितावर कारवाई करण्यात येईल.
नामदेव पाटील , तहसिलदार पाथर्डी.शेतीमाल हमीभावाने खरेदी करावा तसेच व्यवहार पासदर्शक करावा अशा लेखी सूचना बाजार समितीकडून व्यापाऱ्यांना देण्यात आलेल्या आहेत. शेतकऱ्यांची तक्रार आल्यानंतर कायदेशीर कार्यवाही करू.
दिलीप काटे , सचिव बाजार समिती.