पटना – बिहारमधील केडिया या छोट्याशा गावातील शेतकऱ्यांनी निसर्गाशी संवाद साधण्याचा कृतीशील उपक्रम आखला आणि त्याची अंमलबजावणी केल्यामुळे या गावात फुलपाखरे, मधमाशा, पक्षी पुन्हा परत आले असून त्यांच्या आगमनामुळे निसर्गाचा समतोल साधण्यास मोठी मदत झालेली आहे.
या गावातील शेतकऱ्यांनी रासायनिक खते आणि रासायनिक कीडनाशकांचा वापर पूर्णपणे थांबवला असून नैसर्गिक पद्धतीने सेंद्रिय शेती करण्यावर भर दिलेला आहे. गावातील शेतकरी राजकुमार यादव म्हणतात, काही वर्षांपूर्वी मी जेव्हा शेताच्या बांधावरून जायचो तेव्हा भयाण शांतता जाणवायची, कुठेही पक्षांचा किलबिलाट नाही की मधमाशांची गुणगुण नाही, फुलपाखरेही दिसत नव्हती. जास्त उत्पादन मिळावे यासाठी शेतकऱ्यांनी रासायनिक खते आणि कीडनाशकांचा वापर केल्याने जमिनीचा पोत बदलून गेला. मातीतील सूक्ष्म जीवाणू आणि मातीवर प्रक्रिया करत जगणारे जीव नाहीसे झाले. पक्षी, फुलपाखरे, मधमाशा दिसेनाशा झाल्या होत्या.
ही अस्वस्थ करणारी गोष्ट होती. मग गावातील शेतकरी एकत्र आले आणि यावर उपाय म्हणून रासायनिक खते आणि कीडनाशकांचा वापर बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. गावातील जमीन विषमुक्त करण्याचा निर्णय सगळ्यांनी घेतला. जीवित माती किसान समितीच्या झेंड्याखाली सर्वजण एकत्र आले. सगळ्यांनी एकत्र येऊन सकारात्मक निर्णय घेतल्यामुळे आता जमिनीचा पोत राखणारे जीव, गांडूळ, तसेच निसर्गाचे संतुलन ठेवणाऱ्या मधमाशा, फुलपाखरे, पक्षी गावात परत आले आहेत. बिहारची राजधानी पाटण्यापासून शंभर किलोमीटर अंतरावर असणाऱ्या गावाने निसर्ग आणि पर्यावरणाबाबत अतिशय कृतीशील सकारात्मक भूमिका स्वीकारलेली आहे. विशेष म्हणजे पंजाबमध्ये रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे शेतजमिनीचे जे न भरून येणारे नुकसान झाले आहे त्याबाबतचे अनेक व्हिडिओ या ग्रामस्थांनी पाहिले आहे.
एकदा का मातीचे नुकसान झाले की ते परत भरून काढणे शक्य होत नाही याची जाणीव त्यांना झाली. त्यामुळे आपणही याच दिशेने जात राहिलो तर आपली अवस्था पंजाबसारखी होईल ही गोष्ट त्यांच्या लक्षात आली. गावात सिंचनाच्या सुविधा मर्यादित आहेत. गावातील बहुतेक शेतकरी अल्पभूधारक आहेत. त्यामुळे दुग्धउत्पादन हा त्यांचा जोडव्यवसाय आहे. गावात बऱ्यापैकी पशुधन आहे. सुमारे 2000 गायी असल्याने त्यांच्या शेणाऱ्या गोवऱ्या थापून त्या स्वयंपाकासाठी वापरल्या जायच्या. आता बदलत्या परिस्थितीत गायीच्या शेणाची ताकद लक्षात घेऊन त्याचे खतामध्ये रुपांतर करण्यावर शेतकऱ्यांनी भर दिलेला आहे. त्यातून गावातच नैसर्गिक आणि प्रभावी खत तयार होऊ लागले आहे. स्वयंपाकासाठी बायोगॅस बसवून शेणाचा वापर खतासाठी केला जाऊ लागला.