लाहोर : भारतीय संघ आशिया स्पर्धेसाठी पाकिस्तानात खेळण्यास न आल्यास पाकिस्तानही 2021मध्ये होणाऱ्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत भारतात खेळणार नाही, अशी भूमिका पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी वासिम खान यांनी घेतली आहे.
भारताने पाकिस्तानात खेळण्यास नकार दिल्याने पाकिस्तान बीसीसीआयची कोंडी करण्याचा प्रयत्न करत आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात बिघडलेल्या राजकीय संबंधाचा फटका पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला बसत आहे. भारताने पाकिस्तानात क्रिकेट खेळण्यास नकार दर्शविल्याने पाकिस्तानला आशिया चषकाच्या यजमानपदावर पाणी सोडावे लागणार आहे. या स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तानकडे आहे.
पण पाकिस्तानकडून या स्पर्धेचे यजमानपद काढून घेण्यात येणार असून या स्पर्धेसाठी आता बांगलादेश, श्रीलंका किंवा दुबई या पर्यायांचा विचार केला
जात आहे. बीसीसीआयच्या या भूमिकेनंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्ड बीसीसीआयची कोंडी करण्याच्या तयारीत आहे. आशिया चषकाचे यजमानपद कोणाकडे द्यायचे हा निर्णय आयसीसीचा नव्हे तर आशियाई क्रिकेट परिषदेचा आहे. सध्याच्या घडीला आम्ही आशिया चषकासाठी दोन पर्यायांचा विचार करत आहोत.
जर भारताने या ठिकाणी येण्यास नकार दिला, तर पाकिस्तानही 2021 साली भारतात होणाऱ्या टी-20 विश्वचषकात सहभागी होणार नाही, अशी माहिती वासिम खान यांनी डॉन वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत दिली.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडून बीसीसीआयची कोंडी करण्याचा प्रयत्न