मुंबई : भाजपा सरकारला सत्तेवर येऊन नऊ वर्षांचा टप्पा पूर्ण झाला आहे. या पार्श्वभूमीवर भाजपकडून देशभरात कार्यक्रम साजरे करण्यात येत आहेत. या कार्यक्रमांतर्गत गेल्या ९ वर्षांत सरकारने काय केले याबाबतची माहिती देण्यात येत आहे. यावरूनच आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपावर सडकून टीका केली आहे.
काँग्रेसचे प्रदेशध्यक्ष नाना पटोले यांनी आज सकाळी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ,“भाजपा मतविभाजानाचं राजकारण करतंय आणि यापुढेही करत राहील. त्यामुळे त्यावर फार प्रतिक्रिया देण्याची गरज नाही. नऊ वर्षांत काय केलं याच्या जाहिराती त्यांनी केल्या. पण देशातील प्रॉपर्टी विकली, जीएसटीसारखा सुल्तानी कायदा आणून सर्वसामान्यांना लुटलं कसं, यावर नऊवर्षांचं व्याख्या मांडलं असतं तर देशातील वस्तुस्थिती देशासमोर आली असती”, असे म्हणत भाजपावर निशाणा साधला.
पुढे बोलताना त्यांनी,“जीएसटीमुळे सकाळी कोलगेटपासून ते रात्री झोपेपर्यंत लोकांना टॅक्स भरावा लागतो. प्रत्येक ठिकाणी जीएसटी आहे, वीजेवर जीएसटी आहे. पंखा लावला तर त्यावरही जीएसटी आहे. सातत्याने तुमच्यावर टॅक्सचा बोजा बसवून आम्हीच विकास केलाय हा आव आणण्याचा प्रयत्न पंतप्रधानांनी केला. त्यांनी वस्तुस्थिती आणायला पाहिजे होती.
दोन हजारांची नोट आणायची आणि त्यांनीच बंद करायची. नोटाबंदीनंतर सोने गहाण ठेवले आहेत, ही सर्व वस्तुस्थिती मांडायला पाहिजे होती. महागाईमुळे जनता जळते आहे. बेरोजगारी वाढली आहे. ही सर्व परिस्थिती मांडली असती तर खऱ्या अर्थाने विश्वगुरू म्हणवून घेणाऱ्या पंतप्रधानांना विश्वगुरू म्हणता आलं असतं. पण खरं पाप लपवलं गेलं”, असेही नाना पटोले यांनी म्हटले आहे.