कर्वेनगर येथील उड्डाणपूल ठरतोय जीवघेणा; लक्ष देण्याची गरज
पुणे/कर्वेनगर – वाहतूक कोंडी सुटून सुरक्षित वाहतूक होण्यासाठी उड्डाणपूल उभारले जातात. परंतु, कर्वेनगर येथील मुख्य चौकात उभारलेल्या उड्डाणपुलामुळे वाहतूक कोंडी सुटली मात्र, पुलाच्या दोन्ही बाजूला अपघात सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे.
मुख्य चौकातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी येथे उड्डाणपूल उभा करण्यात आला. याचे काम 5 वर्षे संथ गतीने सुरू होते. त्यानंतर 17 फेब्रुवारी 2018 मध्ये पूल वाहतुकीसाठी खुला केला. पूल पूर्ण झाल्यानंतर त्याचे श्रेय घेण्यासाठी भाजप व राष्ट्रवादी कॉंग्रेस यांच्यात नाट्य रंगल्याचे सर्वांनीच पाहिले आहे.
हा पूल इंग्रजी “एक्स’ आकारात बांधल्याने पुलावर वळण तयार झाले असून वेगात असलेले वाहन वळणावर आल्यानंतर चालकाची तारांबळ उडत आहे. तसेच, वाहनावरील ताबा सुटल्याने अपघातही झाले आहेत. हा पूल वाहतुकीसाठी खुला केल्यानंतर त्याच्या एका बाजूला असणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक व दुसरीकडील वनदेवी मंदिर चौक या ठिकाणी वाहतुकीचा बोजवारा उडू लागला. त्यामुळे उड्डाणपुलामुळे कर्वेनगर चौकातील वाहतूक कोंडी सुटली मात्र, त्याचा परिणाम वरील दोन चौकांवर झाल्याचे दिसून आले. वाहतूक पोलिसांनी डॉ. आंबेडकर चौकात वारजेकडून येणारी वाहतूक कॅनॉल रोडने कर्वेनगरकडे जाण्यास बंद केली व वनदेवी मंदिर येथील चौकात वाहतूक नियंत्रण दिवे बसवून या दोन चौकांत होणाऱ्या वाहतूक कोंडीवर मार्ग काढला.
मुळातच कर्वेनगर चौकात उभा केलेला उड्डाणपूल हा भैरवनाथ मंदिरापासून कर्वेनगर चौक व डॉ. आंबेडकर चौक पार करून वारजेतील चौधरी शाळेपर्यंत करण्यात येणार होता. मात्र, तो भैरवनाथ मंदिरापासून कर्वेनगर चौक पार करून काकडे प्लाझाजवळच उतरविण्यात आला. ठरल्याप्रमाणे हा पूल उभा केला असता तर, डॉ. आंबेडकर चौकातील वाहतूक कोंडी सुटली असती. परंतु, बांधकाम व्यावसायिकाच्या फायद्यासाठी पूल चौकाच्या अलीकडेच उतरवल्याची चर्चा रंगली होती.
बेशिस्त पार्किंग जीवावर
सध्या पुलाच्या दोन्ही बाजूला बेशिस्तपणे वाहने पार्क केली जात असल्याने पुलाच्या कडेने आलेल्या वाहनांना एकदम मुख्य रस्त्यावर वळावे लागते. त्याचवेळी पुलावरून वेगाने वाहने खाली येत असल्याने अपघात घडत आहेत. पुलाच्या दोन्ही बाजूला उभ्या राहणाऱ्या वाहनांवर वाहतूक पोलिसांनी वेळीच कारवाई केली नाही तर, याठिकाणी भीषण अपघाताची शक्यता वर्तवण्यात येत आहे.