पुणे (ज्ञानेश्वर फड)- मोडून पडला संसार मोडला नाही कणा पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा, या कुसुमाग्रजांच्या कवितेची आठवण यावी, असे व्यावसायिक यश खेड तालुक्यातील कणेरसर गावच्या रहिवासी असणाऱ्या जयश्री साकोरे यांनी कमावले आहे. पतीचे अकाली निधन.. पदरी दोन मुली असा सारेच माळभ भरून यावे अशी अवस्था… मात्र मनात जिद्द असली की सर्व संकटे सहजी दूर होतात याचा प्रत्यय त्यांच्या कृतीतून आणि यशातून येत आहे.
कणेरसरच्या जयश्री साकोरे यांच्या पतीचे लग्नानंतर अवघ्या चारच वर्षात अपघाती निधन झाले. त्यानंतर आर्थिक परिस्थीती खालावली. सारे काही संपले असे वाटत असताना मला माझ्या आईने उमेद दिली, आपल्या संघर्ष गाथेची माहिती त्या देत असतात. आधी शिक्षण पूर्ण कर हा आईचा पहिला सल्ला. मी डि. एड., आणि पदवीचे शिक्षण पूर्ण केले. मात्र शिक्षक भरती झालीच नाही. दोन मुलींची जबाबदारी डोक्यावर होती. त्यासाठी उत्पन्न हवे. त्याच काळात गावात सेझचा प्रकल्पातून कंपनी उभारली गेली. तिथे पर्यवेक्षक बनले.
तिथे मक्याच्या दाणे वेगळे करून त्यावे प्रक्रिया केली जात असे. हे काम आपणही करू शकतो, हा आत्मविश्वास आला. त्यातूनच हा लघु उद्योग सुरु केला. पण हा प्रवास काही सहजतेने झाला नाही.अडथळे आले, संकटे आली. त्यावर मात करत आळंदी येथे गणेश महाराज यांच्या आश्रमात उद्योगासाठी जागा मिळाली. कष्टाने व्यावसाय वाढवला. त्यातून आज परिसरातील पंचवीसहून अधिक महिलांनाही रोजगार मिळतो, याचे खुप समाधान आहे.
मक्याच्या व्यवसायातील बारकावे मी शिकले आहे. त्यामुळे या व्यवसायात पुडचे पाऊल टाकत प्रक्रिया उद्योगात शिरायचा आमचा निर्धार आहे. माझ्यासारख्याच संकटात असलेल्या महिलांना मदतीचा हात देण्यासाठी हा व्यवसाय वाढवायचा आहे. त्यातून त्या सक्षम बनतील हेच माझे स्वप्न आहे.
अशी होते प्रक्रिया –
हवा असणाऱ्या मक्याचे बीयाणे शेतकऱ्यांना देण्यात येते. त्याची पेरणी करून तो मका आणून देतात. तो सोलून त्यातून दाणे काढतात. एक दिवसात किमान दीड ते दोन टन मका सोलला जातो. ते दाणे प्रक्रियेसाठी कंपनीकडे पाठवतात. तेथे प्रक्रिया करून ते पुढे पाठवतात. यातून शेतकऱ्यांनाही हमीभावाप्रमाणे पैसे मिळतात. मक्याचा पाला आणि कांडरे हे म्हैस, गाय यांना खाण्यासाठी शेतकरी घेऊन जातात.
“लॉकडाऊनमध्ये वस्तीवर काही काम नव्हते. ताईने मक्याचे काम सुरु केल्यामुळे आम्हाला चार पैसे मिळतात. येथे सर्व महिलाच असल्याने सुरक्षित वाटते. कामामध्ये दिवसही आनंदात जातो आणि चार पैशांची संसाराला मदत होते.”
-मंगल सुर्यवंशी
“या कामातून आमच्या घरचा सर्व खर्च निघतो. मी आणि मुलगी दिवसात दोनशे ते अडीचशे किलो मका सोलतो. आम्हाला दिवसाला पाचशे रुपयांहून अधिक रक्कम मिळते. घराशेजारीच काम असल्याने काम करायला खूप आनंद मिळतो.”
-आयेशा अन्सारी
पाहा संपूर्ण व्हिडीओ –