मुंबई: कोरोनाचा सामना करताना सध्याच्या नेतृत्वाकडे प्रशासकीय कौशल्याचा अभाव असल्याची टीका पृथ्वीराज चव्हाण यांनी ठाकरे सरकरवर केली होती. यानंतर काँग्रेसनेते संजय निरुपम यांनी देखील चव्हाण व ठाकरे सरकारवर ताशेरे ओढले होते. दरम्यान, चव्हाण यांनी एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना या प्रकरणावर स्पष्टीकरण दिले आहे.
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, “मी मुख्यमंत्र्यांवर टीका केलेली नाही, आघाडीत विसंगती आहे असे दाखवण्याचा भाजप प्रयत्न करत आहे. मी मुख्यमंत्र्यांना सल्ला दिला, त्याचा अर्थ मी टीका केली असं नाही. त्यामुळे कोणीही चुकीचा अर्थ काढू नये”
चव्हाण म्हणाले, मी प्रशासकीय अधिकाऱ्यांबद्दल बोललो. प्रशासकीय अधिकाऱ्यांना काही वेळा ग्राऊंड रिअॅलिटी माहिती नसते. त्यामुळे अधिकारी आणि मंत्री यांनी समन्वय साधून काम करावे लागते. मात्र मुख्यमंत्री कमी पडतायेत असं मी कुठेच म्हणालेलो नाही. मी केवळ जबाबदाऱ्यांचं वाटप करता येईल असं सांगितलं होतं. त्यानुसार कामाचं वाटप करुन प्रशासकीय जबाबदारी ठरवता येईल, असं मी म्हटलं,”