पुणे, दि. 20 -पीएमपीच्या वेळापत्रकाचा बोजवारा उडाल्याने प्रवासी हतबल झाले आहेत. एक वेळ रस्त्यावर घोडागाडी चालवा; पण ती वेळेवर चालवा, असा खरमरीत सल्ला प्रवाशांनी पीएमपीला दिला आहे. पुुणे व पिंपरी-चिंचवड शहराची महत्वाची सावर्जनिक वाहतूक व्यवस्था म्हणून पीएमपीकडे पाहिले जाते. दररोज दहा लाखांपेक्षा अधिक प्रवासी पीएमीतून प्रवास करतात. दीड हजार बसच्या माध्यमातून दोन्ही शहरात पीएमपीकडून सेवा दिली जाते; पण गेल्या काही महिन्यांपासून बस वेळेवर न येणे, बसची फेरी रद्द होणे, बस मध्येच बंद पडणे, थांब्यावर बस न थांबणे, मार्गावर बसची संख्या कमी यांसारख्या विविध समस्यांनी प्रवासी हैराण झाले आहेत.
कामानिमित्त रोज लाखो प्रवासी पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातून प्रवास करत असतात. पण कामाला जाण्याच्या वेळेस आणि सुटल्यानंतर नेहमीच प्रवाशांना वेळेत बस मिळत नसल्याची भावना प्रवाशांनी व्यक्त केली. याबाबत तक्रार करून देखील काहीच बदल होताना दिसत नाही, अशी प्रतिक्रिया प्रवाशांनी दिली.
अधिकारी सुस्त
याबाबत पीएमपी अधिकांऱ्यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, सर्व मार्गांवरील बस सुरळीत सूरू आहेत. सकाळी आणि सायंकाळी शहरात ट्रॅफीक जाम असल्याचे कारण देत अधिकाऱ्यांनी जबाबदारी झटकली.
मागील काही दिवसांपासून हडपसर मार्गावरील बस रद्द होण्याचे प्रमाण वाढले आहे. एक-एक तास बसची वाट पाहवी लागते.पीएमपीने मार्गावर कोणतीही बस चालवावा किंवा घोडागाडी चालवावी; पण वेळेवर.
-राहुल जाधव, प्रवासी
मी दररोज वाघोली ते चिंचवड प्रवास करते; पण या मार्गावरील बस कधीच वेळेवर येत नाही. यासंदर्भात आम्ही वारंवार तक्रार करून देखील बदल झाले नाहीत.
-शैलजा लोंढे, प्रवासी