पीडितेच्या वडिलांची मागणी
मुंबई :वर्ध्यामधील हिंगणघाट येथे जळीतकांडामध्ये गंभीर जखमी झालेल्या पीडितेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. दरम्यान, तिच्या मृत्यूनंतर माझ्यासमोर आरोपीला जिवंत जाळा,अशी मागणी हिंगणघाट येथील जळीतकांडामध्ये मृत्यू झालेल्या तरुणीच्या वडिलांनी केली आहे. तसेच आरोपीला आमच्या स्वाधीन करण्यात यावं, अशी मागणी मुलीच्या मृत्यूनंतर तिच्या वडिलांनी केली आहे. तसेच माझ्या मुलीला लवकरात लवकर न्याय मिळावा, अशीही अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. ऑरेंज सिटी रुग्णालयात उपचार सुरू असताना सकाळी 6.55 मिनिटांनी पीडितेची प्राणज्योत मालावली.
हिंगणघाट येथे 3 फेब्रवारी रोजी एकतर्फी प्रेमातून प्राध्यापक तरुणीवर पेट्रोल ओतून तिला जिवंत जाळण्याचा प्रयत्न एका तरुणाने केला. हिंगणघाटच्या एका महाविद्यालयात वनस्पतीशास्त्र विषयासाठी अर्धवेळ प्राध्यापक म्हणून कार्यरत होती. पीडित तरुणी कॉलेजला जात असताना आरोपी विकेश नगराळे दुचाकीतील पेट्रोल काढून तिच्यावर ओतले आणि अतिशय निदर्यतेने तिला जाळण्याचा प्रयत्न केला. यामध्ये तरुणी 40 टक्क्यांहून अधिक भाजली. या तरुणीवर खासगी रुग्णालयात उपचार सुरु असतानाच तिचा मृत्यू झाला.
माझ्या मुलीला जसा त्रास झाला तसा त्रास आरोपीला झाला पाहिजे,अशी भावना मुलीच्या निधनानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना पीडितेच्या वडिलांनी व्यक्त केली आहे. त्याला जिवंत जाळले पाहिजे. त्याला जनतेसमोर आणले पाहिजे. इतकचं मी यावेळी सांगू शकतो,असेही पडितेच्या वडिलांनी सांगितले. तसेच या प्रकरणाची तातडीने सुनावणी घेण्यात यावी यासाठी प्रयत्न केले जात आहेत. यासंदर्भात बोलताना, लवकरात लवकर या खटल्याचा निर्णय लावा, नाहीतर आरोपीला आमच्या स्वाधीन करा, अशी मागणी पीडितेच्या वडिलांनी केली आहे.