रायपूर – वीज कोसळल्याने जखमी झालेल्यांना गायीच्या शेणामध्ये पुरण्याची घटना छत्तीसगडमधील जशपूर जिल्ह्यात घडली आहे. हा जिल्हा आदिवासी बहुल आहे आणि अंधश्रद्धेतून ही कृती घडली आहे. वीज पडल्याने जखमी झालेल्या तिघांना उपचारांसाठी गायीच्या शेणामध्ये पुरण्यात आले. त्यापैकी दोघांचा मृत्यू झाला आहे, असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. शेणामध्ये पुरलेल्या तिघांना नंतर रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, तिथे पोहोचण्यापूर्वीच दोघांचा मृत्यू झाला होता, असेही या अधिकाऱ्याने सांगितले.
राजधानी रायपूरपासून 400 किलोमीटर अंतरावरच्या बागबहार गावामध्ये रविवारी संध्याकाळी पाऊस पडत असताना भाताच्या शेतामध्ये काम करणाऱ्या तिघांच्या अंगावर अचानक वीज पडली. मात्र, जखमी झालेल्या तिघांना रुग्णालयात हलवण्याऐवजी अंधश्रद्धेपोटी गळ्यापर्यंत गायीच्या शेणामध्ये पुरण्यात आले. भाजल्यावर गायीच्या शेणाचा उपचार होऊ शकतो, अशी या भागातील अंधश्रद्धा आहे, असे जशपूरचे पोलीस उपविभागीय अधिकारी राजेंद्र परिहार यांनी सांगितले.
नंतर काही ग्रामस्थांनी हस्तक्षेप केल्यावर तिघाही जखमींना स्थानिक रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, उपचारांपूर्वीच दोघाजणांचा मृत्यू झाला होता. तिसऱ्या व्यक्तीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणाची नोंद करण्यात आली असून मृतांच्या नातेवाईकांना नियमानुसार भरपाई दिली जाणार आहे.