मुंबईः महिला व बालविकास विभागात तब्बल १८ हजार ८८२ पदांची बंपर भरती करणार असल्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. या भरती प्रक्रियेमध्ये बालविकास विभागाअंतर्गत ५६३९ अंगणवाडी सेविका व १३२४३ अंगणवाडी मतदनीस यांची भरती केली जाणार आहे. ही भरती प्रक्रिया १४ फेब्रुवारी ते २ मार्च दरम्यान सरळ सेवेच्या माध्यमातून राबविली जाणार असल्याची माहिती राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली.
महिला व बालविकास विभागातील विविध रिक्त पदांची भरती करण्याबाबत मंत्री अदिती तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील त्यांच्या दालनात अधिकाऱ्यांसमवेत बैठक पार पडली. या बैठकीत महाराष्ट्र शासनाने ७० हजार पदांची भरती करण्याचा निर्णय घेतला असून, महिला व बालविकास विभागांतर्गत एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत ५६३९ अंगणवाडी सेविका व १३२४३ अंगणवाडी मदतनीस अशा एकूण १८८८२ पदांची भरती करण्यात येणार आहे असल्याचे त्यांनी सांगितले.
१४ फेब्रुवारी ते २ मार्च दरम्यान मुख्य सेविका पदासाठीही सरळ सेवेच्या माध्यमातून भरती प्रक्रिया राबवण्यात येत असून, ही प्रक्रियाही पारदर्शक पद्धतीने राबवण्याबाबत उचित खबरदारी घेण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना अदिती तटकरे यांनी दिले. यासोबतच राज्य महिला आयोग, महिला आर्थिक विकास महामंडळ, बालकल्याण समिती, बाल न्याय मंडळातील रिक्त पदांचीही भरती प्रक्रिया लवकरात लवकर सुरू करावी अशा सूचना अधिकाऱ्यांना त्यांनी दिल्या. या बैठकीला महिला आणि बालविकास विभागाचे सचिव डॉ.अनुप कुमार यादव, एकात्मिक बाल विकास सेवा योजनेचे आयुक्त कैलास पगारे यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.