मुंबई : राज्यातील बैलगाडी शर्यतीस प्राचीन सांस्कृतिक परंपरा लाभलेली आहे. बैलगाड्या शर्यती हा राज्यातील शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे. राज्यात या शर्यती पुन्हा सुरू करण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील असून राज्यात बैलगाड्या शर्यत सुरु होणार असल्याचा विश्वास पशुसंवर्धनमंत्री सुनील केदार यांनी व्यक्त केला.
महाराष्ट्र राज्यातील बैलगाडी शर्यत सुरू व्हावी याकरिता शासन प्रयत्नशील असून याबाबत सुरुवातीपासून पाठपुरावा करण्यात येत आहे. सन 2014 पासून बैलगाडा शर्यतीवर बंदी घालण्यात आली होती. तत्कालीन सरकारने त्यासंदर्भात 2017 मध्ये कायदा लागू केला. परंतु पाठपुराव्याअभावी 2017-2018 पासुन आजवर कोणतीही ठोस सकारात्मक घटना यादरम्यान झाली नाही आणि शर्यती बंदच राहिल्या, असे मंत्री केदार म्हणाले.
ऑगस्ट 2020 मध्ये बैलगाडा चालक,शेतकरी,पशुपालक आणि लोकप्रतिनिधी यांची बैठक घेण्यात आली आणि या विषयास पुन्हा चालना मिळाली. कोरोनाचा प्रभाव कमी झाल्याबरोबर यावर्षी पुन्हा प्रयत्न सुरू करण्यात आले. यासाठी दि.24 ऑगस्ट 2021 रोजी सर्व बैलगाडा मालक,पशुपालक यांची मंत्रालयाच्या प्रांगणात बैठक घेण्यात आली, अशी माहिती मंत्री केदार यांनी सांगितली.
मंत्री केदार म्हणाले, यासंदर्भातील न्यायालयीन प्रक्रिया 4 वर्ष प्रलंबित व बंद पडलेली होती. ती या शासनाने सुरू केली. लवकरच याबाबत सकारात्मक निर्णय येईल, असा विश्वास वाटतो. बैलगाडी मालक व पशुपालक सुजाण असून त्यांनी पोकळ भुलथापांना बळी पडू नये,असे अवाहनही पशुसंवर्धन मंत्री केदार यांनी केले.