अगोदर रेल्वेचे 100 वर्षे जुने पूल बदला
नवी दिल्ली – भारतासारख्या पायाभूत सुविधांचा अभाव असलेल्या देशात बुलेट ट्रेन ही संकल्पना अंमलात आणली जाऊ शकत नाही. यासंदर्भात घोषणा करणारे अफवा पसरवीत आहेत. बुलेट ट्रेन ही संकल्पना भारतासाठी बोगस असल्याचा आरोप तृणमूल कॉंग्रेसने लोकसभेत केला.
रेल्वेच्या अनुदान मागण्यांवर चर्चेवेळी या पक्षाचे नेते सुदीप बंडोपाध्याय यांनी सांगितले की, बुलेट ट्रेन भारतात चालू शकत नाही. फार तर वेगवान ट्रेन म्हणता येईल. मात्र या संदर्भातली आश्वासने ह्या केवळ अफवा आहेत. बुलेट ट्रेनची कधीही पूर्ण न होणारी स्वप्ने दाखविण्याऐवजी केंद्र सरकारने रेल्वेचे जे पूल शंभर वर्षापेक्षा जास्त जुने आहेत ते नव्याने तयार करण्याच्या शक्यतेवर विचार करावा. कारण त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झालेला आहे.
त्याचबरोबर रेल्वेमध्ये मोठ्या प्रमाणात चालक आणि गॅंगमनची गरज आहे. ही तूट दोन लाखापर्यंत गेलेली आहे. त्यामुळे सध्या चालकावर कामाचा ताण वाढलेला आहे. यातून अपघात घडत आहेत. असे प्राथमिक प्रश्न सोडविण्याऐवजी सरकार बुलेट ट्रेनची स्वप्ने भारतीयांना दाखवत असल्याचा आरोप त्यांनी केला. रेल्वेचे डबे जुने झालेले आहेत,स्वच्छता नाही, त्याचबरोबर खाद्यपदार्थांना दर्जा नाही हे प्रश्न प्राधान्यक्रमाने सोडविण्याची गरज आहे.