साखर आयुक्त शेखर गायकवाड यांची माहिती : ट्रॅक्टरवर स्पीकर लावल्यास कारवाई
रेडा – पुणे जिल्ह्यातील सहकारी साखर कारखाने व खासगी साखर कारखाने यांचा उसाचा गळीत हंगाम 22 नोव्हेंबरपासून सुरू झाला आहे. कारखाना कार्यक्षेत्र अंतर्गत राष्ट्रीय महामार्ग किंवा राज्य महामार्ग व इतर मार्गावरून कारखान्याला लागणारा ऊस ट्रक बैलगाडी ट्रॅक्टर व इतर वाहनाद्वारे वाहून आणला जातो. बेशिस्त वाहतुकीमुळे व नियम न पाळल्यामुळे अनेकांचा नाहक बळी जातो. त्यामुळे कोणत्याही कारखान्याच्या परिसरामध्ये वाहतुकीमध्ये अपघात होऊ नयेत म्हणून नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आदेश साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी एका पत्राद्वारे पुणे जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यांना आदेश दिला आहे.
काटामारीची घेतली दखल
गाळप हंगामात साखर कारखान्यांकडून वजन काटा मारला जात असल्याबाबत तक्रारी शेतकरी व शेतकरी संघटनेकडून साखर आयुक्तालयाकडे प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे कोणत्याही शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये, नियंत्रण आणण्यासाठी साखर कारखान्याच्या वजन काटे तपासणीसाठी भरारी पथकाची स्थापना करण्यात यावी, असे लेखी पत्र राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना साखर आयुक्तालयाने दिले आहेत. भरारी पथकामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयातील प्रतिनिधी हे पथक प्रमुख असणार आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाचे प्रतिनिधी, प्रादेशिक सहसंचालक साखर यांचे प्रतिनिधी, शेतकरी प्रतिनिधी व जिल्हा वैद्य मापन शास्त्र अधिकारी सदस्य सचिव पथकामध्ये समाविष्ट असणार आहेत.
शेखर गायकवाड म्हणाले की, ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर, ट्रेलर व इतर वाहनचालकांनी वाहन चालवताना लायसन्सची मूळ प्रत जवळ ठेवलीच पाहिजे. ऊस वाहतूक करताना ट्रॅक्टरने एकावेळी दोनपेक्षा जास्त ट्रेलर ऊस वाहतूक करू नये. ट्रेलर किंवा वाहनाची एकत्रित लांबी अठरा मीटरपेक्षा जास्त असता कामा नये, ऊस वाहतूक करणाऱ्या सर्व वाहनांच्या पाठीमागील बाजूस चार बाय चारचे रिफ्लेक्टेड बोर्ड बसवणे गरजेचे आहे. ऊस वाहतूक करताना ट्रॅक्टर, ट्रेलर, बैलगाडी वाहनांना महामार्गावर जात असताना ज्या मार्गावर सर्व्हिस रोड आहे. तेथे सर्व्हिस रोडचा वापर करण्यासाठी कारखान्यांनी सूचना दिल्या पाहिजेत. ऊस वाहून नेत असताना ट्रॅक्टर चालकाने वेगमर्यादा दहा किमी पेक्षा जास्त असू नये, अशा कडक सूचना सर्व कारखान्यांना दिल्या आहेत.
अनेक सहकारी साखर कारखाने व खासगी कारखाने यांच्या परिसरातील नागरिकांनी ट्रॅक्टर चालक आपल्या ट्रॅक्टरवर स्पीकर लावून कर्णकर्कश आवाजात गाणे लावून इतर वाहनांचा चालकांचा कोणताच विचार न करता सुसाट वेगाने चालवतात. अशा वाहनचालकांना स्पीकर न बसवण्याच्या सक्त सूचना संबंधित कारखान्याने कराव्यात, जर केलेल्या सूचनांचे पालन झाले नाही तर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा गायकवाड यांनी दिला आहे.