तूर, हरभरा व कापूस खरेदी प्रक्रिया १५ एप्रिल पासून सुरू होणार
बुलढाणा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात २५ मार्च २०२० पासून १४ एप्रिल २०२० पर्यंत लॉकडाऊन करण्यात आले आहे. सदर लॉकडाउन च्या कालावधीत नाफेड तूर हरभरा खरेदी केंद्र तसेच कापूस पणन महामंडळ मार्फत कापूस खरेदी प्रक्रिया बंद करण्यात आली होती. यामुळे शेतकऱ्यांचे चांगलेच नुकसान होत आहे. शेतकऱ्यांचा शेतमाल पडून राहत असल्यामुळे ही खरेदी प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यात यावी. अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
सदर मागणीच्या अनुषंगाने पालकमंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा केली व तूर, हरभरा व कापूस खरेदी प्रक्रिया सुरू करावी अशी मागणी केली. त्यानुसार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तूर, हरभरा व कापूस खरेदी प्रक्रिया दिनांक १५ एप्रिल २०२० पासून सुरू करण्याचे निर्देश दिले.
तुर, हरभरा व कापूस या शेतमालाच्या खरेदीची प्रक्रिया दिनांक १५ एप्रिल २०२० पासून सुरू करण्यात येणार आहे. यामूळे शेतकरी बांधवांना मोठा दिलासा मिळणार आहे. सदर चर्चेच्या वेळी मुख्य सचिव अजोय मेहता, अपर मुख्य सचिव (वित्त) मनोज सैनिक व अनुपकुमार सचिव (पणन) हे उपस्थित होते.