भुवनेश्वर: अरबी समुद्रात निर्माण झालेल्या “क्यार’ आणि “महा’ या चक्रीवादळांनी सर्वांनाच हवालदिल करून सोडले आहे. असे असतानाच बंगालच्या उपसागरावरील “बुलबुल’ चक्रीवादळ तीव्र शक्यता वर्तविण्यात आली आहे. व्यापक पावसाचा अंदाज वर्तविला जात असून ओडिशा सरकारने राज्यातील ३० पैकी १५ जिल्ह्यांना संभाव्य पूरपरिस्थितीबाबत जागरुक राहण्याचे निर्देश दिले आहेत. भारतीय हवामान खात्याच्या (आयएमडी) अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली.
चक्रीवादळाच्या केंद्राभोवती फिरणाऱ्या हवेचा वेग ११८ ते १६५ किलोमीटर प्रतितास असण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. अंदमान निकोबार बेटे, भारताची पूर्व किनारपट्टी, बंगालच्या दक्षिण भागासह म्यानमारच्या किनारपट्टीवर याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.
हे चक्रीवादळ बंगालच्या उपसागराच्या दक्षिण पूर्वेस आणि पारादीपच्या दक्षिण-दक्षिणपूर्व ८१० कि.मी. आणि पश्चिम बंगालच्या सागर बेटाच्या ९२० कि.मी. दक्षिण-पूर्वेस आहे. येणाऱ्या २४ तासात हे वादळ काही काळ पश्चिम-वायव्य दिशेने सरकण्याची शक्यता आहे. त्यानंतर उत्तर-पश्चिम दिशेने पश्चिम बंगाल आणि उत्तर ओडिशाला लागून असलेल्या भाग आणि बांगलादेश किनारपट्टीकडे जाण्याची शक्यता आहे.