बुलंदशहर – उत्तर प्रदेशातील बुलंदशहर जिल्ह्यातील अनूपशहर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या महिला पोलीस उपनिरिक्षकाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ही घटना शुक्रवारी रात्री घडली असून आरजू पवार असे आत्महत्या केलेल्या महिला उपनिरिक्षकाचे नाव आहे.
बुलंदशहरचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक संतोष कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरजू पवार यांनी आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेली चिठ्ठी सापडली आहे. त्यात पवार यांनी ‘हे माझ्या कर्माचे फळ आहे’ असे लिहिले आहे.
आरजू पवार ह्या 2015 मध्ये पोलीस दलात भरती झाल्या होत्या. सध्या त्या अनूप नगर पोलीस ठाण्यामध्ये कार्यरत होत्या. त्यांनी आत्महत्येसाठी कोणालाही दोषी ठरवले नसून हे माझ्या कर्माचे फळ आहे, असे सुसाईड नोटमध्ये म्हटले आहे. फाॅरेंसिक टीम घटनास्थळी पोहोचली असून पुढील तपास सुरू आहे.
पवार ह्या मुळच्या शामली जिल्ह्यातील रहिवाशी असून त्या बुलंदशहर येथे एकट्याच एका किरायाच्या घरात राहत होत्या. शुक्रवारी सात वाजता त्या ड्यूटीवरून घरी आल्या होत्या. रात्री नऊ वाजता जेवणासाठी खोलीच्या बाहेर न आल्याने घरमालक यांनी त्यांना अनेक फोन काॅल केले मात्र त्यांनी उत्तर दिले नाही. घराचा दरवाजा ठोठावल्यानंतरही त्यांनी काहीच उत्तर न दिल्याने त्यांना संशय आला.
पोलीसांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी येऊन दरवाजा तोडला तेंव्हा आरजू यांचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. पुढील तपास बुलंदशहर पोलीस करत आहेत.