भोपाळ – अयोध्येतील राममंदिर सर्वांच्याच संमतीने आकाराला येत आहे, असे मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कलमनाथ यांनी म्हटले आहे. तर त्यांचे सहकारी व ज्येष्ठ कॉंग्रेस नेते दिग्विजयसिंह यांनी म्हटले आहे की अयोध्येत राममंदिराची उभारणी व्हावी ही खुद्द राजीव गांधी यांचीच इच्छा होती.
अयोध्येत येत्या 5 ऑगस्ट रोजी राममंदिराचा भूमिपूजन समारंभ होत आहे. त्या पार्श्वभूमीवर जारी केलेल्या एका व्हिडीओ संदेशात कमलनाथ यांनी म्हटले आहे की, अयोध्येत राममंदिराची उभाणी व्हावी ही या देशातील जनतेची खूप वर्षांपासूनची इच्छा आहे.
मंदिर उभारणीला सर्वांचाच पाठिंबा आहे, असेही त्यांनी नमूद केले. सर्वच देशवासीयांच्या विश्वासाचे प्रतीक म्हणून प्रभू रामचंद्रांकडे पाहिले जाते, असेही त्यांनी यात नमूद केले आहे. तथापि, त्यांनी मुहूर्त शोधून हे काम व्हायला हवे होते, अशी अपेक्षा व्यक्त केली.
देशातील 90 टक्के हिंदूंचा मुहूर्त, ग्रहदशा, ज्योतिष, चोैघडीया अशा बाबींवर विश्वास असतो पण 5 ऑगस्टला कोणताही मुहूर्त नसताना त्या दिवशी तेथे हा का घाट घातला जात आहे, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. हा हिंदूंच्या धार्मिक भावनांशी खेळ करण्याचा प्रकार आहे, अशी टीकाही त्यांनी केली आहे.
कमलनाथ यांच्या वक्तव्यावर टीका करताना भाजप नेते व राज्याचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा म्हणाले की, काही लोकांना टीका करायची सवयच असते. ते नेहमी चांगल्या गोष्टीत वाईट गोष्टी शोधत असतात. पण निदान त्यांनी प्रभू रामचंद्रांचे नाव घेतले हे काही कमी नाही, अशी टिप्पणी त्यांनी केली.
राम हे काल्पनिक पात्र असल्याची भूमिका या आधी काही कॉंग्रेस नेत्यांनी घेतली होती, असा आरोपही त्यांनी केला. दरम्यान, प्रभू रामचंद्रांच्या जन्मस्थानी त्यांचे मंदिर उभारले जावे ही राजीव गांधी यांचीच इच्छा होती असे दुसरे एक ज्येष्ठ कॉंग्रस नेते दिग्विजयसिंह यांनी म्हटले आहे.