खासदार बापट यांनी विचारला महापालिका अधिकाऱ्यांना प्रश्न
पुणे – “समान पाणी पुरवठा योजनेत पाण्याच्या टाक्या बांधत आहात, की आग्य्राचा ताजमहल? दीड वर्ष होऊनही या टाक्यांची कामे का पूर्ण होत नाहीत,’ असा प्रश्न खासदार गिरीश बापट यांनी महापालिकेतील संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना शुक्रवारी बैठकीत विचारला.
शवपेट्या घेण्यासाठी निधी दिली असून, त्यातून या पेट्यांची खरेदी का होत नाही, प्राण्यांची विल्हेवाट लावणाऱ्या यंत्रणेसाठी निधी दिला आहे त्याचे पुढे काय झाले? पोस्ट ऑफिसकडून त्यांच्या कार्यालयांसाठी जागा मागण्यात येत आहेत त्यावर निर्णय कधी घेणार? असे अन्य प्रश्नही बापट यांनी आयुक्त आणि अधिकाऱ्यांना विचारले.
विविध योजनांचा आढावा घेत बापट यांनी आयुक्त सौरभ राव यांच्या उपस्थितीत अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले. आर्थिक वर्ष संपण्यास अवघे अडीच- तीन महिनेच शिल्लक आहेत. बापट यांनी पालकमंत्री असताना महापालिकेला जिल्हा नियोजन मंडळातून (डीपीडीसी) अडीच कोटी रुपयांचा निधी दिला आहे. तो खर्चाअभावी पडून राहिल्याने बापट यांनी अधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्तीच केली.
मृत प्राण्यांच्या विल्हेवाटासंबंधी विचारल्यावर “जागा शोधण्यात येत आहे’ असे उत्तर प्रशासनाकडून आले. त्यावेळी “मी जागा शोधण्यासाठी जाणे अपेक्षित आहे का’, असा बोचरा प्रतिप्रश्न बापट यांनी केला. प्रकल्पासाठी निधी आहे, महापालिकेकडे विविध जागा आहेत, तरीही त्याबाबत सकारात्मक पावले उचलली जात नसल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली.
पोस्ट ऑफिस कार्यालयाकडून शहरातील विविध ठिकाणी पोस्ट ऑफिससाठी जागा मागण्यात आल्या आहेत. काही ठिकाणी पोस्ट ऑफिस सुरूही झाली आहेत. मात्र, तेथील करार झालेले नाहीत. समाविष्ट गावांमध्येही पोस्ट ऑफिसची आवश्यकता आहे. त्यामुळे त्यांना जागा देणे गरजेचे असल्याच्या सूचना बापट यांनी यावेळी दिल्या.
हडपसर येथील कचरा प्रक्रिया प्रकल्पांचा आढावाही त्यांनी घेतला. शवपेट्या घेण्यासाठी डीपीडीसीमधून निधी देण्यात आला असला तरी त्यावर निर्णय झाला नाही. वाढीव दराने निविदा आल्यानंतर त्यापुढे फेरनिविदा काढणे अथवा अन्य कार्यवाही करण्यात न आल्याने बापट यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. “डीपीडीसी’चा निधी मार्च अखेरीनंतर विनियोग होणार नाही. त्यामुळे तत्काळ याबाबत निर्णय घेण्याच्या सूचनाही त्यांनी केली.