पुणे – पुणे शहर, उपनगर, बारामती, पुरंदरसह इतर ठिकाणी अतिवृष्टी झाली. यात अनेकांच्या घरांचे नुकसान झाले आहे. त्या सर्वांना शासनाने घरे बांधून द्यावीत, अशी मागणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत केली.
पवार म्हणाले, सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास अतिवृष्टीने बाधित परिसरास भेट देवून पाहणी केली. अनेक नागरिकांची घरे वाहून गेली आहेत. सध्या त्यांची पर्यायी व्यवस्था केली आहे. मात्र, ही मदत तात्पुरती आहे. कोल्हेवाडी, किरकटवाडी परिसरात मोठे नुकसान झाले आहे. तेथे शासकीय मालकीच्या जमिनी आहेत. केंद्र सरकारच्या गृहप्रकल्पाच्या योजनेचा आधार घेऊन कायमस्वरुपी पक्की घरे बांधून द्यावीत. बहुतांश कुटुंबांचे संसारोपयोगी साहित्य वाहून गेले आहे. त्यांना तत्काळ मदत करावी. सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील पूरस्थितीतही पुणेकरांनी मोठ्या प्रमाणात मदत केली होती. आताही पुणेकरांनी मदतीला पुढे यावे, असे आवाहनही पवार यांनी केले.