कोल्हापूर – पुणे – बेंगलोर व रत्नागिरी -नागपूर या राष्ट्रीय महामार्गावरील सांगली जिल्ह्यातील पेठ नाका ते बेळगांव जिल्ह्यातील हत्तरकी टोल नाका व आंबा घाटापासून ते मिरज शहरापर्यंत असलेल्या राष्ट्रीय महामार्गांच्या नद्यावरील पुलामुळे व भरावामुळे यावर्षी कोल्हापूर, सांगली व बेळगांव जिल्ह्याच्या सीमाभागामध्ये महापुराने थैमान घातले असून महापुराचे पाणीपातळी कमी होण्यास वेळ लागल्याने नागरी वस्तीत व शिवारात जास्त दिवस पाणी राहिल्याने शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामुळे तातडीने या महामार्गावरील पुलांचा भराव कमी करून कमानी बांधण्यात यावे अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेटटी यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचेकडे केली.
सन २००५ , २००६, २०१९ व २०२१ या महापुराचा विचार करता २०२१ च्या महापुरात कोल्हापूर , सांगली व बेळगांव जिल्ह्यातील महापुराची परिस्थिती बदलले असल्याचे जाणवून आले आहे.जागतिक तापमान वाढीत बदल होत चालल्याने यावर्षी एकाच दिवसात जवळपास ८५० मिलीमीटर हून अधिक पाऊस आंबोली पासून ते महाबळेश्वर पर्यंतच्या सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर झाला व हे पावसाचे पाणी वेगाने नदीपात्रात आले.
कृष्णा , पंचगंगा , दुधगंगा, वेदगंगा व हिरण्यकेशी या नदयावर जे पूल बांधलेले आहेत. त्या अनेक पूलाच्या दोन्ही बाजूस दोन -दोन किलोमीटर भराव आहे. महापूर काळामध्ये नदया पाञापासून दोन – दोन किलोमीटर पाणी पसरते अशा काळात हे पूल बंधा-याचे काम करतात म्हणून नदीतील पाण्याची पातळी अत्यंत मंद गतीने कमी होते.मी सांगली , कोल्हापूर व बेळगांव जिल्ह्यातील पुरग्रस्त भागाचा दौरा करत असताना परिसरातील ग्रामस्थ व शेतकर्यांनी पुलाच्या भरावामुळे निर्माण झालेली परिस्थीती निदर्शनास आणून दिली.
या तीनही जिल्ह्यातील महापुरास कारणीभूत ठरत असलेल्या राष्ट्रीय महामार्गावरील कृष्णा , वारणा , पंचगंगा , दुधगंगा , वेदगंगा व हिरण्यकेशी नद्यावरील पुलांचा भराव कमी करून दोन्ही बाजूस दोन -दोन कमानी बांधकाम केल्यास पाण्याचा फुगवटा कमी होऊन पात्राबाहेर पडलेले पाणी सहजगत्या प्रवाहीत होईल.
सध्या रत्नागिरी -नागपूर या नवीन महामार्गाच्या आंबा घाट ते मिरज शहर बायपास रोड या मार्गावरही अनेक ठिकाणी नवीन पुल बांधकाम व भराव टाकण्याचे काम प्रगतीत सुरू असून या कामातही पाणी प्रवाहित होण्यासाठी जलसंपदा विभागातील अधिका-यांसोबत बैठक घेऊन पुलाचा व रस्त्याचा भराव कमी करून कमानी वाढविणे गरजेचे आहे. तरी केंद्र सरकारकडून या पुलांचे भराव कमी करून कमानी बांधकाम करणेस निधी उपलब्ध करून तातडीने या कामांना सुरवात करण्याची मागणी केली.
यावेळी केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी येत्या १५ दिवसात कोल्हापूर , सांगली व बेळगांव या तीनही जिल्ह्यातील महामार्गाच्या परिस्थितीचा अभ्यास करण्यासाठी तज्ञांच पथक पाठवून देणेंसदर्भात मंत्रालयातील संबंधित अधिका-यांना सुचना दिल्या. कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मा. बांधकाम व आरोग्य सभापती सावकर मादनाईक , अमित पाटील , सागर मादनाईक , हर्षद इंगळे आदि पदाधिकारी उपस्थित होते.