युवा महोत्सवाचेही आयोजन : आमदार लांडगे यांची माहिती
पिंपरी – महेशदादा स्पोर्टस फाउंडेशन आणि अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ, त्र्यंबकेश्वर (नाशिक) यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (दि. 5) भोसरीमध्ये 500 गडकोट किल्ल्यांच्या प्रतिकृती बनविण्याचा जागतिक विक्रमाचा उपक्रम होणार आहे. इयत्ता तिसरी ते 10 वीतील विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या स्वराज्याची व गडकोट किल्ल्यांची माहिती व्हावी आणि गडकोट किल्ल्यांच्या संवर्धनाचा संदेश देण्याच्या उद्देशाने “किल्ले बनवा’ हा जागतिक विक्रमाचा उपक्रम व राज्यस्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती आमदार महेश लांडगे यांनी दिली.
शुक्रवारी (दि. 27) पिंपरी येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेस माजी महापौर नितीन काळजे, राहुल जाधव, कार्यक्रमाचे समन्वयक अजित सस्ते, नितीन मोरे, मनोज काळे, माधव कुलकर्णी, संदीप मोरे, आनंद फुले, सई तिकोने आदी उपस्थित होते.
उपक्रमाबाबत माहिती देताना आमदार लांडगे म्हणाले, महेशदादा स्पोर्टस फाउंडेशनच्या वतीने पर्यावरण जनजागृतीसाठी इंद्रायणी नदी सुधार उपक्रम, महिला बचत गटांना मोफत खुले व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने इंद्रायणी थडीचा उपक्रम, रिव्हर साक्लोथॉन, स्वच्छता व वृक्षलागवडीचे महत्त्व सांगण्यासाठी अवरित श्रमदान, विद्यार्थ्यांमधील क्रीडागुणांना संधी देण्यासाठी मुलींचा कबड्डी व खो-खो संघ, मुला-मुलींचा कराटे संघ, भवानी तालीम व कुस्ती संघ, वारकरी सांप्रदाय व अध्यात्म क्षेत्रातील अध्यात्माचे महत्त्व सांगण्याच्या उद्देशाने कीर्तन महोत्सव, रामायण व भागवत कथा महोत्सव असे अनेक समाजोपयोगी उपक्रम राबविले जात आहेत.
रविवारी (दि. 5) भोसरीतील कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृहाशेजारील पटांगणावर आयोजित केलेल्या या उपक्रमात इयत्ता 3 री ते 10 वी मधील 500 बालसंस्कार वर्ग सहभागी होणार आहेत. या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराजांनी जिंकलेल्या 500 गड-किल्ल्यांच्या प्रतिकृती हे विद्यार्थी साकारणार आहेत. सकाळी 9 वाजता या स्पर्धेचे उद्घाटन महापौर माई ढोरे, आमदार लक्ष्मण जगताप, प्रमुख पाहुणे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांच्या उपस्थितीत होणार आहे.
विविध शाळांमधील हजारो विद्यार्थ्यांच्या सहभागातून एकाच दिवशी- एकाच वेळी तब्बल 500 हून अधिक मातीचे गड-किल्ले बनवून त्याद्वारे छत्रपती शिवरायांच्या गड-किल्ल्यांची व महाराष्ट्राच्या जाज्वल्य इतिहासाची माहिती जागतिक स्तरावर पोहचवण्याचा प्रयत्न आहे. पुणे जिल्हा हा छत्रपती श्री शिवाजी महाराजांची जन्मभूमी आणि कर्मभूमी आहे. तसेच जिल्ह्यातील विविध किल्ले देखील प्रसिद्ध आहेत. त्यामुळे या उपक्रमाला विशेष महत्त्व आहे.
या उपक्रमात जे मातीचे गड-किल्ले उभारले जाणार आहेत. त्या किल्ल्यांची भौगोलिक तसेच ऐतिहासिक पार्श्वभूमी दर्शवणारे पोस्टर त्याठिकाणी असणार आहेत. विद्यार्थी मातीचे गड-किल्ले साकारताना किल्ल्यांचे प्रकार, वैशिष्ट्य व वेगळेपण, तसेच गडकिल्ल्यांवर असणारे विविध अवशेष याबाबत सर्व माहिती त्यांना होणार आहे. या उपक्रमासाठी विभागाच्या विशेष टीमद्वारे किल्ले कसे बनवावे याचे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना देण्यात येत आहे. या उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या हातून उभारले जाणारे हे गड-किल्ले म्हणजे एक प्रकारे इतिहासाचा प्रत्यक्ष जागरच आहे. विद्यार्थी व युवांमध्ये छत्रपती शिवरायांचे विचार रुजविणे तसेच उपक्रमांतून गड-किल्ल्यांच्या संरक्षण-संवर्धनाचे अभियान अधिक बळकट करणे, असा उद्देश या राज्यस्तरीय युवा महोत्सव आयोजनाचा आहे. राज्यस्तरीय युवा महोत्सवासाठी सातारा, सांगली, कोल्हापूर, अहमदनगर, नाशिक, नंदूरबार, बीड, परभणी, यासह विविध जिल्ह्यांतून युवक येणार आहेत.
उपक्रम सर्वांसाठी खुला
या उपक्रमात सहभागी होण्यासाठी प्रवेश मूल्य नाही. आजपर्यंत 497 बालसंस्कार वर्ग व युवा वर्ग संघांनी नोंदणी केली आहे. यामध्ये दुबई, व्हिएतनाम आणि पश्चिम महाराष्ट्रातील संघाचा सहभाग आहे. उपक्रमाचे उद्घाटन सकाळी 9 वाजता, 10 ते दुपारी 1 वाजेपर्यंत किल्ले बनवणे उपक्रम होईल. दुपारी 1 ते रात्री 10 वा. व दुसऱ्या दिवशी सोमवारी (दि. 6) सकाळी 8 ते रात्री 10 वाजेपर्यंत शिवप्रेमींसाठी किल्ले पाहण्यासाठी खुले राहतील.