नवी दिल्ली : देशातील आणि राज्यातील लॉकडाउन जरी आवश्यक असला तरी राज्याची आणि विस्कटलेली आर्थिक घडी पुन्हा मार्गावर आणण्यासाठी उद्योगधंदे सुरू केले पाहिजेत असं मत अनेक उद्योगपतींनी व्यक्त केले. त्यातच महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा यांनी लॉकडाउन वाढवण्याच्या मुद्दावर पुन्हा एकदा आपली चिंता व्यक्त केली. लॉकडाउनसारखे निर्णय आर्थिक दृष्टीने अनर्थकारी ठरू शकतात असे आनंद महिंद्रा यांनी म्हटले आहे. पण प्रशासनासमोर असलेले पर्याय सुद्धा तितके सोपे नाहीत हे सुद्धा त्यांनी मान्य केले. तसेच करोनाग्रस्तांची वाढती संख्या पाहता त्यांनी फिल्ड हॉस्पीटल उभारा, लष्कराकडे त्याचं कौशल्य आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
योजना आखणाऱ्यांसाठी पर्यायांची निवड करणं फारसं सोपं राहणार नाही पण लॉकडाउनचा कालावधी वाढवून काही साध्य होणार नाही. करोनाग्रस्तांची संख्या ही वाढत राहिल. फिल्ड हॉस्पीटल उभारण्यावर आपण आपलं लक्ष केंद्रीत केलं पाहिजे. लष्कराकडे याबाबतचं प्रचंड कौशल्य आहे, असं मत महिंद्रा यांनी व्यक्त केले.
Lockdown extensions aren’t just economically disastrous, as I had tweeted earlier, but also create another medical crisis. This article highlights the dangerous psychological effects of lockdowns & the huge risk of neglecting non-covid patients. (1/2) https://t.co/XAks2nxbdH
— anand mahindra (@anandmahindra) May 25, 2020
त्यांनी आपल्या आणखी एका टि्वटमध्ये एका लेखाचा सुद्धा दाखला दिला आहे. ज्या लेखात कोविड-१९ ची लागण न झालेल्या रुग्णांकडे होणारे दुर्लक्ष आणि लॉकडाउनच्या गंभीर मानसिक परिणामांकडे लक्ष वेधण्यात आलं आहे. लॉकडाउन वाढवल्यामुळे फक्त आर्थिक अनर्थच ओढावणार नाही तर त्यामुळे अन्य गंभीर वैद्यकीय संकट निर्माण होऊ शकते’ असे आनंद महिंद्रा यांनी आपल्या टि्वटमध्ये म्हटले आहे.
लॉकडाउन आणखी बऱ्याच काळासाठी वाढवला तर आर्थिक हाराकिरीची परिस्थिती निर्माण होऊ शकते असे आनंद महिंद्रा या महिन्याच्या सुरुवातीला म्हणाले होते. लॉकडाउनमुळे लाखो लोकांचे प्राण वाचवता येतील पण लॉकडाउन वाढला तर मात्र समाजातील कमकुवत घटकांच्या अडचणींमध्ये वाढ होईल असेही त्यांनी नमूद केले होते.