कोणतीही सरकारी मदत पोहचेना : बाहेरून येणाऱ्या व्यक्तींना मज्जाव
पुणे – अत्यंत उपेक्षित आणि दुर्लक्षित समजल्या जाणाऱ्या बुधवार पेठेतील देवदासींना करोनाच्या पार्श्वभूमीवरील लॉकडाउनच्या स्थितीत कोणतीही सरकारी मदत मिळत नाही. इतरवेळी गजबजलेल्या या भागात आता भयाण शांतता दिसून येते. यावेळी अनेक संस्था आणि सार्वजनिक मंडळे उपेक्षितांच्या मदतीला धावून जात आहेत. मात्र, गेल्या बारा दिवसांपासून देवदासींच्या वस्तीत अजून शासकीय मदत पोहोचली नाही.
या वस्तीत सुमारे तीन ते साडेतीन हजार देवदासी महिला आहेत. यातील बऱ्याच कर्नाटक, आसाम, आंध्र, पश्चिम बंगालमधील आहेत. सध्या यातील बऱ्याच महिना लॉकडाउनच्या आधीच गावी गेल्या आहेत, मात्र तरीही साधारण हजार महिला येथे वास्तव्याला आहेत. यांचे पोट हातावरचे आहे, परंतु करोनामुळे येथे बाहेरून कोणत्याही व्यक्तीस येण्यास मज्जाव करण्यात आला आहे आणि तो स्वयंस्फूर्तीने या महिलांनीच स्वसंरक्षणासाठी केले आहे. एका खोलीत किंवा घरात पाच ते सहा महिलांची संख्या आहे. या परिसरात साधारणतः 70 टक्के महिला या हॉटेलमधून मागवण्यात येणाऱ्या जेवणाच्या पार्सलवर अवलंबून आहेत, तर सुमारे 30 टक्के महिला घरी स्वयंपाक करतात. त्यांचा व्यवसायच बंद असल्याने आर्थिक चणचणीचा सामना त्यांना करावा लागत आहे.
महापालिकेकडून स्वच्छता
महापालिका कर्मचाऱ्यांकडून या भागात दिवसातून दोन वेळा साफसफाई केली जात आहे. सफाईचे साहित्य पुरेसे असून, आतापर्यंत दोन वेळा परिसरात फवारणी झाल्याचे सफाई कामगार राजेंद्र पवार यांनी सांगितले. या भागात काही वेळा वापरलेले मास्क रस्त्यावरच टाकून दिले जात आहेत, तेही आम्ही लगेच गोळा करून कंटेनरमधून डेपोकडे पाठवत आहेत.
पोलिसांकडून वारंवार प्रबोधन
या वस्तीत करोनापासून बचावासाठी वारंवार प्रबोधनात्मक संदेश देत पोलिसांच्या गाड्या फिरत आहेत. त्यात मास्क, सॅनिटायझरचा वापर करणे, साबणाने हात धुणे, परिसर स्वच्छ ठेवणे याबाबत सूचना देण्यात येत आहेत. परिसरात कोठेही गर्दी आढळून आली, की लगेच पोलीस हस्तक्षेप करून गर्दी दूर करण्याचा प्रयत्न करत आहेत.
महाराष्ट्र तरुण मंडळाचे सहकार्य
सिटी पोस्टमागे असलेल्या महाराष्ट्र तरुण मंडळ गेल्या 12 दिवसांपासून येथील सुमारे 600 महिलांना रोज दुपारचे अन्न पुरवते आहे. त्याचबरोबर स्वच्छतेबाबतही मंडळाचे कार्यकर्ते प्रबोधन करत आहेत. यासाठी मंडळाचे अध्यक्ष पृथ्वीराज येळवंडे, उपाध्यक्ष अमर गायकवाड आणि कार्यकर्ते काम करत असल्याचे नाना शिंदे यांनी सांगितले.
गेल्या बारा दिवसांपासून या भागात कोणत्याही संस्थेची अथवा सरकारी मदत आली नाही. मात्र, येथील काही कार्यकर्ते रोज दुपारचे जेवण आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. करोना आजाराबाबत आम्हाला संपूर्ण माहिती देण्यात आली आहे, त्यामुळे आम्ही स्वयंस्फूर्तीने आमचा व्यवसाय बंद ठेवला आहे. लॉकडाउन किती दिवस असेल याची कल्पना नाही; पण या आजाराचे गांभीर्य आमच्या लक्षात आलेले आहे. त्यामुळे सुरक्षेबाबत आम्ही काळजी घेत आहोत.
– नागोव्वा कांबळे आणि कमला राठोड बुधवार पेठ