पुणे – ऑरगॅनिक फूड म्हणजे सेंद्रीय अन्नधान्याबाबत देशभरात चांगली वातावरण निर्मिती होत आहे. देशातील आणि परदेशातील या उत्पादनाची बाजारपेठ वाढत आहे. त्यामुळे सेंद्रीय अन्नधान्याचे उत्पादन वाढल्यास शेतकऱ्यांना चांगला आधार मिळू शकतो. मात्र, अशा प्रकारची शेती करण्यामध्ये बरेच अडथळे आहेत ते दूर केले जावेत, अशी अपेक्षा अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर या उद्योगाने व्यक्त केली आहे.
अशा प्रकारची शेती करणारे आता भारतात बऱ्याच प्रमाणात वाढले आहेत. त्यांच्या संघटनेचे प्रमुख दिवेकर भल्ला यांनी सांगितले की, याबाबतच्या चाचण्या महाग पडतात. त्यासाठी याकरिता देशातील चाचणी केंद्राची आणि इतर पायाभूत सुविधांत वाढ होण्याची गरज आहे. ऑरगॅनिक शेती करण्याअगोदर या शेतीतील रसायने संपुष्टात यावी त्याकरिता पाच वर्षे संबंधित जमिनीवर शेती करता येत नाही. शेतकऱ्यांना ते परवडत नाही. यासाठी अशा शेतकऱ्यांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष अनुदानाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
ऑरगॅनिक फुडच्या उपयोगितेबाबत मोठ्या शहरांमध्ये चांगली वातावरणनिर्मिती झाली आहे. मात्र, छोट्या शहरांमध्ये याबाबत वातावरण निर्मिती करण्यासाठी कृषी मंत्रालयाने आणि इतर विभागांनी पुढाकार घेण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. युरोप आणि अमेरिकेत हे क्षेत्र बरेच पुढे गेले आहे. त्यापासून शिकून तसे प्रयोग भारतात करण्याची गरज आहे.