मुंबई : राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरु होणार आहे. दरम्यान, या अधिवेशात शेतकरी, विद्यार्थ्यांचे प्रश्न, कायदा आणि सुव्यवस्थेविषयी झालेल्या गोंधळामुळे सत्ताधाऱ्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न विरोधकांकडून केला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर दुसरीकडे विरोधकांचा समाचार घेऊ, असे थेट आव्हानच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहे. त्यांच्या या आव्हानामुळे आजपासून सुरू होणारे अर्थसंकल्पीय अधिवेशन वादळी ठरण्याची चिन्हे आहेत.
दरम्यान,अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्र्यांनी आयोजित केलेल्या चहापानाच्या कार्यक्रमावर विरोधकांनी अलीकडे पडलेल्या परंपरेप्रमाणे बहिष्कार घातला. शिंदे-फडणवीस सरकारचा उल्लेख विरोधकांनी घटनाबाह्य सरकार असा केला. कायदा आणि सुव्यवस्थेचा उडालेला बोजवारा, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजी मंत्री आदित्य ठाकरे किंवा जितेंद्र आव्हाड या माजी मंत्र्यांच्या वाहनांच्या ताफ्यावर झालेली दगडफेक किंवा कुटुंबीयांना जीवे मारण्याची दिलेली धमकी यावरून राज्यात कायद्याचे राज्य अस्तित्वात आहे का, असा सवाल विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला.
तर दुसरीकडे सत्ता गेल्यामुळे हवालदील झालेले विरोधक गेल्या काही दिवसांपासून घटनाबाह्य सरकार असे बिनबुडाचे आरोप करीत आहेत. राज्यातील जनतेचा आम्हाला मिळणारा अभूतपूर्व प्रतिसाद ही विरोधकांची पोटदुखी असून त्यातूनच अनाठायी आरोप करून राज्यातील वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला जात आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधकांचा चांगलाच समाचार घेऊ, असा गर्भित इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला.
शिवसेना पक्षनाव आणि चिन्ह शिंदे गटाला देण्याचा निवडणूक आयोगाचा निर्णय, ठाकरे गटाच्या आमदारांवर पक्षादेश बजाविण्याचा शिंदे गटाने दिलेला इशारा या साऱ्यांचे पडसाद अधिवेशनात उमटण्याची चिन्हे आहेत.