भाज्यांची दरवाढ सुरुच : जेवणातून पालेभाज्या गायब
पिंपरी – पावसामुळे भाजीपाल्यांच्या दरामध्ये झालेली दरवाढ अद्याप थांबवलेली नाही. मोशी उपबाजार समिती आणि पिंपरी भाजी मंडईमध्ये येणाऱ्या भाजीपाल्याची आवक अद्यापही घटलेली असल्यामुळे या आठवड्यातही भाजीपाल्याचे दर चढेच राहिलेले आहेत. या आठवड्यात किरकोळ बाजारात कांदा 70 रुपयांच्या घरात, तर तर कोथिंबीरची एक जुडी 80 रुपयांवर गेल्याने सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे.
महाराष्ट्रातील अनेक भागात परतीच्या पावसाचा शेतीपीकाला मोठा फटका बसला. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेली पिके वाया गेली. मुसळधार पावसात फळभाज्या आणि पालेभाज्यांचा पालापोचळा झाला. परिणामी मोठे नुकसान झाल्यामुळे सध्या पुणे शहरासह पिंपरी-चिंचवड शहरात ग्रामीण भागातून होणारी भाजीपाल्याची आवक मोठ्या प्रमाणात घटली आहे. नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीपासून आवक घटल्याने किरकोळ बाजारात वाढलेले भाजीपाल्याचे दर अद्यापही कमी झालेले नाहीत.
सध्या पिंपरी येथील भाजीमंडईमध्ये कोथिंबीरीच्या जुडी 70 रुपयांना आहे, तर मागील आठवड्याप्रमाणेच या आठवड्यात कांद्यासाठी प्रतिकिलो 70 रुपये मोजावे लागत आहे. लसूण 200 रुपये किलो प्रमाणे विकाला जात आहे. तर मिरचीचा दर 60 रुपये किलो झाला आहे. गवार, भेंडी, टोमॅटो, वटाणा, वांगी, ढोबळी, शेवगा, घेवडा कारली यांच्या दरामध्येही सातत्याने वाढ होत असल्याने सध्या गृहिणीचे बजेट कोलमडले आहे. भाजीपाल्याची आवक वाढेपर्यंत दर खाली येणार नसल्यामुळे पुढील काही दिवस तरी भाज्यामधील ही भाववाढ कायम राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
भाजीपाला विक्रीचे दर
कांदा : 70, लसूण : 190-200, कोथिंबीर जुडी : 60-70, हिरवी मिरची : 50, बटाटा : 30, मटार : 120-130, वाल : 80-90, टोमॅटो : 50-60, मेथी जुडी : 20-30, भेंडी : 50-55, वांगी : 40-50, शेवगा : 50, ढोबळी : 30, दोडका : 35, कोबी : 15, पालक जुडी : 15, शेपू : 15.