पाटणा :– मोदी सरकारच्या कार्यकाळात रेल्वेचा अर्थसंकल्प आणि सर्वसाधारण एकत्रितपणेच मांडण्याची पध्दत रूढ झाली आहे. तसे न करता दोन्ही अर्थंसकल्प पहिल्यासारखेच स्वतंत्रपणे मांडावे अशी मागणी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी केली आहे.
नितीश सध्या बिहारमध्ये समाधान यात्रेवर निघाले असून त्यांनी नालंदा येथे पत्रकारांशी संवाद साधला. 1998 ते 2001 या काळात राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारमध्ये नितीश रेल्वेमंत्री होते. त्यावेळी आपण अनेक युवकांना रेल्वेत नोकरी दिल्याचे नमूद करत नितीश म्हणाले की, संसदेत रेल्वेचा अर्थसंकल्प सादर केला जायचा तेव्हा सगळ्या वृत्तपत्रांमध्ये त्याची चर्चा व्हायची. त्यामुळेच वेगळ्या बजेटला खूप महत्व असून ते वेगवेगळेच सादर केले पाहिजेत अशी माझी मागणी आहे.
दरम्यान, बिहारला विशेष राज्याचा दर्जा देण्याची मागणी त्यांनी पुन्हा एकदा उपस्थित केली. तसेच जातीच्या आधारावर जनगणना करण्याच्या विषयावर न्यायालयाने आमच्या बाजूने निर्णय दिला आहे. ती सगळ्यांच्या हिताची आहे.
वास्तविक हे काम केंद्र सरकारचे आहे. मात्र राज्य म्हणून आम्ही ते करत आहोत. प्रत्येक गोष्टीची माहिती असली की सुविधा उपलब्ध करून देताना ती उपयुक्त ठरते असे त्यांनी नमूद केले.