नवी दिल्ली – पश्चिम बंगाल, आसाम, केरळ आणि तामिळनाडूमध्ये आगामी विधानसभा निवडणुका आहेत. या पार्श्वभूमीवर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सोमवारी सादर केलेल्या अर्थसंकल्पात या चारही राज्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला.
पश्चिम बंगाल आणि आसाममधील चहाच्या मळ्यांमध्ये काम करणाऱ्या महिला आणि त्यांच्या मुलांसाठी एक हजार कोटी रुपयांची घोषणा करण्यात आली आहे. त्याचबरोबर केरळ आणि तमिळनाडूत महामार्गांसह मेट्रो उभारण्याची घोषणा करण्यात आली आहे. यावेळी शेतकरी आंदोलन, करोना विषाणूमुळे देखील अर्थसंकल्पावर लक्ष होते. सरकारने करोना लसीसाठी निधी जाहीर केला आहे.
- दोन्ही राज्यांतील चहाच्या मळ्यांमध्ये काम करणाऱ्या महिला आणि त्यांच्या मुलांसाठी 1000 कोटी रुपये दिले जाणार आहेत.
- बंगालमध्ये 25 हजार कोटींचे महामार्ग तयार होणार आहेत. कोलकाता-सिलीगुडी रस्त्याचे अपग्रेड होईल.
- आसाममध्ये राष्ट्रीय महामार्गावर 34 हजार कोटी रुपये खर्च केले जातील.
- कोची (केरळ) मेट्रोत 1900 कोटी रुपये खर्चुन 11 किमी भाग तयार केला जाईल.
- चेन्नईमध्ये (तमिळनाडू) 63 हजार कोटींच्या खर्चाने 180 किमी लांब मेट्रो मार्ग उभारला जाईल.
- तमिळनाडूत 3500 किमी राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांतर्गत 1.03 लाख कोटी रुपये खर्च केले जातील. याचे बांधकाम पुढील वर्षापासून सुरु होईल.
- केरळमध्ये 1100 किमी राष्ट्रीय महामार्गाचे बांधले जातील. याअंतर्गत मुंबई-कन्याकुमारी कॉरिडोर देखील उभारले जाईल. केरळमध्ये यावर 65 हजार कोटी रुपये खर्च केले जातील.