नवी दिल्ली – जर तुम्ही भाड्याच्या घरात राहत असाल आणि तुम्हाला यातून सुटका हवी असेल आणि स्वतःच्या घराचे स्वप्न पूर्ण करायचे असेल तर तुमच्यासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात चांगली बातमी आहे.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आर्थिक वर्ष 2021-22चा अर्थसंकल्प सादर करताना नवीन घर खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. स्वस्त घर विकत घेण्यासाठी ‘आवास’ कर्जाच्या व्याजावर 1.5 लाख रुपयाच्या अतिरिक्त कर कपातीला एका वर्षाची मुदत वाढवून 31 मार्च 2022 पर्यंत करण्याची घोषणा केली आहे. यामुळे सुस्तावलेल्या रिअल इस्टेट क्षेत्रात मागणी वाढण्यास मदत होणार आहे.
सरकारने 2019च्या अर्थसंकल्पात दीड लाख रुपयांची अतिरिक्त कपातीची घोषणा केली होती. पहिल्यांदाच आणि 45 लाख रुपयांपर्यंत घर विकत घेणाऱ्यांना हा लाभ मिळणार आहे.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज 2021-22 च्या अर्थसंकल्पीय भाषणात म्हटले की, सरकार सर्वांसाठी “आवास’ आणि परवडणाऱ्या घरांना प्राधान्य देत आहे.
सीतारामन यांनी म्हटले की, ‘जुलै 2019च्या अर्थसंकल्पात मी परवडणारे घरे विकत घेण्यासाठी आवास कर्जावरील व्याजावर दीड लाख रुपये अतिरिक्त कपातीची सूट दिली होती. मी आता या सूट ला आणखी एका वर्षासाठी 31 मार्च 2022 पर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव ठेवत आहे.’
स्थलांतरित मजुरांनाही मिळणार स्वस्त घरे
अर्थमंत्र्यांनी आपल्या घोषणेत स्थलांतरित कामगारांसाठीही तरतूद केलेली आहे. अर्थमंत्री सीतारामन यांनी स्थलांतरित मजुरांसाठी स्वस्त दराने भाड्याची घरे उपलब्ध करून देणाऱ्या योजनेची घोषणा केली आहे.