बुलढाणा – जेमतेम शेती, डोक्यावर कर्जाचा वाढता डोंगर यामुळे लग्न जुळण्यास अडचणी येत असल्याने तरूणाने स्वत:च सरण रचून त्यात उडी घेऊन आत्महत्या केली आहे. महेंद्र नामदेव बेलसरे (वय 30, पळशी खुर्द, खामगाव) असे आत्महत्या केलेल्या तरूणाचे नाव आहे. बुधवारी रात्री ही धक्कादायक घटना उघडकीस आली. या घटनेने शेतकरी मुलांना कोणी मुलगी देत नसल्याने शेतकरी पुत्रांना होणारा त्रास पुन्हा अधोरेखीत झालाय.
पळशी खुर्द येथे बुधवारी दोन ठिकाणी लग्न समारंभ होते. महेंद्र बेलसरे हाही या लग्नांमध्ये सामील झाला होता. परंतु सायंकाळी अचानक महेंद्र एकटाच आपल्या शेताकडे गेला. तो घरी परतलाच नाही. त्याने आपल्या शेतामध्येच रात्री आठच्या सुमारास स्वत:च सरण रचत आणि अंगावर पेट्रोल ओतून सरणामध्ये उडी घेतली. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. मात्र या तरुणाचे लग्न जुळत नसल्याने त्या निराशेपोटी आत्महत्या केली, अशी माहिती नातेवाईकांनी पोलिसांनी दिली आहे. या घटनेने आसपासचा परिसर सुन्न झाला आहे.
आजच्या घडीला शेतकऱ्यांना आणि त्यातल्या त्यात अल्पभूधारक शेतकऱ्यांना लग्नासाठी कोणी मुलगी देत नाही, हे पुन्हा एकदा समोर आले आहे. पण ही परिस्थिती विदारक असल्याने बदलायला सामाजिक संघटना शासन स्तरावर प्रयत्न करणे गरजेचे झाले आहे. आतातरी सरकार काही पाऊलं उचलणार का? हे पाहावे लागेल. या घटनेचा तपास खामगाव ग्रामीण पोलिस करत आहेत.