पुणे-नगर महामार्गावर येरवडा ते आपले घर जकात नाका प्रवास धोक्याचा
स्वंचलीत दरवाजे खराब, डिजिटल फलक झाले बंद
– चंद्रकांत जगधने
वडगावशेरी – पुणे-नगर महामार्गावर येरवडा ते आपले घर जकात नाका, असा बीआरटी मार्ग बनविण्यात आला होता. हा मार्ग बनवताना अनेक राजकीय पक्षांकडून विरोध दर्शविला जात होता. अपघातांमुळे हा बीआरटी मार्ग सतत चर्चेत राहिला. पीएमपीलचा प्रवास वेगाने आणि सुरक्षित व्हावा, या उद्दशाने बीआरटी मार्ग तयार करण्यात आला होता. परंतू, येथील बीआरटी मार्ग आणि बस थांबे मोडकळीस आले असल्याने शहरातील अन्य ठिकाणांप्रमाणे येथील हा मार्गही बंद करण्यात यावा अशी मागणी जोर धरू लागली आहे.
पुणे शहरात तसेच उपनगरांत कोट्यवधी रुपये खर्च करून बीआरटी मार्ग तयार करण्यात आला. परंतु, नागरिकांना अद्यापही यामार्गावर धोकादायक पद्धतीने बसची वाट पहावी लागत आहे. तसेच, बस थांब्यावर बसची माहिती देणारे डिजिटल फलक ही बंद अवस्थेत असल्याने प्रवाशांची धांदल उडत आहे. मुख्य म्हणजे नागरिकांच्या सुरक्षेतेसाठी आटोमॅटिक दरवाजे बसवण्यात आले आहेत. पण, ही यंत्रणा ही बंद पडली असून दरवाजे सतत उघडे असल्याने खोलगट बसथांब्यावर धोकादायक पद्धतीने प्रवाशांना बसमध्ये चढ-उतर करावी लागत आहे.
सुरक्षिततेच्या दृष्टीने येथे कोणत्याही प्रकाराची सुविधा नाही. स्मार्ट सिटी अंतर्गत मेट्रोच्या सुरू असलेल्या कामामुळे बीआरटीचा अर्धामार्ग येरवडा ते विमाननगरचौक पर्यत पूर्ण बंद आहे. त्यामुळे या मार्गावरील पीएमपीएलचे उत्पन्न कमी झाले आहे. या मार्गावर प्रशासनाला जास्त उत्पन्न मिळत होते. प्रवाशांकडूनही बसने प्रवासाला प्राधान्य दिले जात होते. आपले घर ते विमाननगर चौक या ठिकाणी बीआरटी मार्ग सुरू आहे, त्यालाही चांगला प्रतिसाद आहे. परंतू, सध्या मेट्रोचे काम सुरू असल्याने अनेकवेळा येथे वाहतूक कोंडी होऊन वाहन चालक नाईलास्ताव बीआरटी मार्गातून वाहने दामटत आहेत. यामुळे या मार्गावरील बसच्या मार्गात अडथळे निर्माण होऊन बीआरटी मार्गावरून बसचा प्रवासही वेगाने होण्याऐवजी संथगतीने होत आहे.
संध्याकाळच्या वेळी तर या मार्गावर प्रवाशांना पाच मिनिटांचा प्रवास करायलाही किमान एक ते दोन तासाचा वेळ जात आहे. बीआरटीत मार्गावर वाहतूक कोंडी झाल्यास तासनं तास वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे बीआरटी मार्ग सुरू करण्याचा उद्देशच मागे पडला असून या मार्गात होणारी अन्य वाहन चालकांची घुसखोरी बंद करावी किंवा हा मार्गच बंद करून रस्ता रूंद करावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
विशेष म्हणजे येथे राजकीय पक्षांकडूनही सुरवातीलाच येथे बीआरटी मार्गाला विरोध होत होता. आजची या मार्गाची स्थिती पाहता त्यांची ही मागणी योग्य होती, अशी चर्चा आता नागरिकांसह प्रवाशांत आहे.
नगर महामार्गावरील बीआरटी मार्गाचा खेळखंडोबा झाला आहे. कोणहीती सुविधा या मार्गात प्रशासनाकडून दिली जात नाही.त्यामुळे या मार्गावर अपघात होत आहेत. याला जबाबदार कोण? योग्य नियोजन करून बीआरटी मार्ग सुरक्षित करावा.
– करीम शेख, कॉंग्रेस कार्यकर्तेया मार्गावर अपघात झालेले आहेत. बीआरटीमार्गाला शिवसेनाच अनेक वेळा विरोध होता. आम्ही वेळोवेळी शिवसेनेकडून आंदोलन ही केली. मात्र, बीआरटी मार्गावरील बसथांबे धोकादायक झाले आहेत, त्यामुळे स्वयंचलित दरवाजे लवकरात लवकर दुरुस्त करण्यात यावेत अन्यथा आम्ही आमच्या स्टाईलने काम करून घेऊ.
– दैलात चौधरी, शिवसेना