स्पर्धा सोडाच, आहेत ते ग्राहक सांभाळण्यातही उदासीनता
पुणे – ‘ग्राहकांची संख्या वाढविणे आपल्या आवाक्यात नसेल, तर किमान आहे ती ग्राहक संख्या घटणार नाही याची तरी काळजी घ्यावी’ असे व्यवहारशास्त्र सांगते; पण या उक्तीस भारत संचार निगम लिमिटेड अर्थात इडछङ ला अपवाद समजायला हवे.
आपली विस्कळीत सेवा, व्यावसायिकतेची वानवा, ग्राहकांबद्दल असलेली अनास्था याचा फटका बीएएएनएलच्या बहुतांश ग्राहकांना बसतच असतो. मात्र, कारभात सुधारणा काही होत नाही. “प्रभात’च्या एका वाचकाने याबाबत त्याना झालेला मनस्ताप कळवला आहे. अंदाजे एप्रिलच्या सुरुवातीस त्यांचा फोन “डेड’ झाला. त्याची त्यांनी रीतसर तक्रार वेळीच नोंदवली आणि संगणकीकृत तक्रार क्रमांकही मिळाला. संबंधित दूरध्वनी क्रमांक व्यावसायिक कामासाठी असल्याने लॉकडाऊन संपेपर्यंत तरी काही अडले नव्हते. पण, 15 मेच्या पुढे लॉकडाऊनमध्ये अंशतः सूट दिल्यानंतर मात्र फोन नादुरुस्त असणे परवडणारे नव्हते. तरी काही काळ वाट पाहून ते बीएसएनएलच्या बाजीराव रोड येथील कार्यालयात अर्ज घेऊन गेले.
तेथून त्यांना शुक्रवारपेठ एक्सचेंज येथे जाण्यास सांगितले. “हे टोलवणे अपेक्षित होतेच,’ असे त्यांचे म्हणणे. तिथे अर्ज दिल्यावर तरी फोन सुरू होईल अशी भाबडी अपेक्षा होती! पण तीही फोल ठरली. बरं चौकशी करावी तर, फोन न उचलणे, जेवणाची सुट्टी असणे, संबंधित व्यक्ती जागेवर नसणे, अशा स्थिती दाखवल्या जात किंवा गैरजबाबदारीची साचेबद्ध सरकारी उत्तरे कानावर पडत.
शेवटी कसेबसे तेथील एका महिलेने ‘संबंधित व्यक्तींना कळवते’ असे सांगितले व त्यांनी अन्य व्यक्तीचे नाव व नंबर दिले; आता नवा अध्याय सुरू झाला. संबंधित व्यक्ती सहकार्याच्या भूमिकेत होते पण “सांगतो’, “करतो’ या पुढे त्यांचीही मजल जात नव्हती. त्यांच्या सांगण्यावरून लाइनमनला गाठले, तर त्यांनी वेगळीच अडचण सांगितली की “तुमचा फोन मोबाइलवर ट्रान्स्फर केला असल्याने ते ट्रान्स्फर काढल्याशिवाय फोन सुरू होणे शक्य नाही,’ मग त्यासाठी परत एक अर्ज आणि पर्यायाने एक नवे पत्र यांच्या शरणागतीत जाणे आले. त्यांना कित्येक फोन केले पण त्यांनी फोनच उचलला नाही. मेल केला तर त्यालाही प्रतिसाद ढिम्मच, असे या वाचकाने सांगितले.
एप्रिलमध्ये बंद पडलेला फोन अजूनही बंदच
एकूण संपर्कात आलेल्या तिन्ही-चारही कर्मचाऱ्यांनी तक्रारदाराचाच फुटबॉल करून ठेवला. फोन का बंद आहे याची नेमकी माहिती कोणालाच नाही. समन्वयही नाही. ग्राहकाची काळजी तर त्याहूनही नाही. एकूण काय तर एप्रिलमध्ये बंद पडलेला फोन आजपर्यंत बंदच आहे. गेल्या पावणेदोन महिन्यांत तक्रारदाराचे बरेच आर्थिक नुकसानही झाले पण कोणी काही दाद लागू देईना असे या ग्राहकाचे म्हणणे आहे. आता जर फोन यदाकदाचित सुरू झालाच, तर मग एक नवी लढाई समोर आहेच ती म्हणजे बंद काळातील भाडं न आकारण्याबाबतची. त्यासाठी किती खेटा घालाव्या लागतील, देवास ठाऊक, अशी साधार चिंताही त्यांनी व्यक्त केली आहे.