पुणे – गेल्या काही दिवसांपासून एमटीएनएल आणि बीएसएनएलची परिस्थिती बिघडली असून आता त्याचा परिणाम कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांच्या पगारावर होऊ लागला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कर्मचाऱ्यांचा जुलै महिन्यातील पगार झालेला नाही.
हा विषय राष्ट्रीय पातळीवरही चर्चिला जात आहे. काही माध्यमांनी बीएसएनएलचे अध्यक्ष आर. के. पुरवार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी कर्मचाऱ्यांचे पगार 5 ऑगस्ट रोजी केले जाण्याची शक्यता असल्याचे सांगितले. मात्र, कामगार संघटनांच्या नेत्यांनी, आम्हाला याबाबत काहीही माहिती नसल्याचे सांगितले. सर्वसाधारणपणे कर्मचाऱ्यांचा पगार महिन्याच्या शेवटच्या तारखेला केला जातो.
मात्र, जुलै महिन्याचा पगार अद्याप मिळालेला नाही. असा प्रकार दोनवेळा घडला आहे. दरम्यान, या कंपन्यांची परिस्थिती सुधारण्यासाठी सरकार प्रयत्न करणार असल्याचे सांगितले जाते.