कर्मचारी संघटनेचा आरोप
नवी दिल्ली : सरकारी क्षेत्रातील बीएसएनएल हीं दूरसंचार कंपनी सध्या आर्थिक अडचणीत आली आहे. या कंपनीला आर्थिक अडचणीतून बाहेर काढण्यासाठी मदतीचे पॅकेज सरकारने जाहीर करणे अपेक्षित होंते पण अजून ते जाहीर न झाल्याने कर्मचारी संघटनांमध्येही असंतोष आहे. त्या संबंधात संचार निगम एक्झीक्युटीव्ह असोशिएशन या संघटनेने म्हटले आहे की बीएसएनएलला आर्थिक मदतीचे पॅकेज देण्यास अर्थमंत्रालयातूनच कोलदांडा घातला जात आहे.
बीएसएनएलचे पुनरूज्जीवन होऊ शकत नाही त्यामुळे या कंपनीला मदतीचे पॅकेज देऊन उपयोग नाही अशी धारणा या मंत्रालयाची झाली आहे असा आरोप या संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे. बीएसएनएलचे पद्धतशीर खच्चीकरण करण्यात आले, या कंपनीला अद्यापही 4 जी सेवेचा परवाना देण्यात आलेला नाही असा आरोप या संघटनेने केला आहे. बीएसएनएल ही पुनरूज्जीवीत होऊ शकत नाही अशी पंतप्रधान कार्यालय आणि नीती आयोगाचीही सुरूवातीची धारणा होती. पण नंतर त्यांनी ही भूमिका बदलली त्यामुळे बीएसएनएलला मदतीचे पॅकेज मिळेल असे वाटले होते पण अजून अर्थमंत्रालय याच भूमिकेवर अडून राहिले आहे असे त्यांनी म्हटले आहे. देशाचे राजकीय नेतृत्व या कंपनीच्या नैसर्गिक मृत्यूची वाट पहात आहे असा आरोपही या संघटनेने केला आहे