भुज – सीमा सुरक्षा दलाने पाकिस्तानच्या दोन बोटी कच्छ जवळील सर खाडीत जप्त केल्या. सीमा दलाचे जवान नौकेतून या भागात पहारा देत असताना त्यांना तेथे या दोन बोटी सोडून दिलेल्या आढळल्या. त्या नेमक्या तिथे कशा आल्या आणि त्या तिथेच का ठेवण्यात आल्या होत्या याचा आता शोध घेतला जात आहे.
या बोटी आढळून आल्यानंतर सीमा सुरक्षा दलाच्या जवांनी या सागरी भागात अन्यत्रही जाऊन पहाणी केली पण त्यांना तेथे आक्षपार्ह असे काहीं आढळून आलेले नाही. पाकिस्तानी बाजुकडून भारतीय सागरी हद्दीत अनेक ठिकाणी अशा बेवारस बोटी सोडून दिल्या जात असल्याचे आढळून येत आहे.
या बोटी पाकिस्तानी मच्छिमारांच्या आहेत असे भासत असले तरी मग इतक्या सातत्याने या बोटी भारतीय सागरी हद्दीत सोडून का दिल्या जात आहेत याचे गूढ मात्र अजुन उकललेले नाही. सीमा सुरक्षा दलाकडून आता या पार्श्वभूमीवर सागरी हद्दीत अधिक दक्षपणे लक्ष दिले जात आहे.