केंद्रीय मंत्री जावडेकर; देशातील हवेचे प्रदूषण निश्चितच कमी होईल
पुणे – एप्रिल 2020 पासून देशात “बीएस 6′ मानकाची वाहने वापरण्यास सुरुवात झाली असून प्रदूषण कमी करण्याच्या दृष्टीने “बीएस 6′ हे क्रांतिकारी पाऊल आहे. यामुळे आगामी काळात देशातील हवेचे प्रदूषण निश्चितच कमी होईल, असा विश्वास केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्री प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केले.
हवा प्रदूषण या विषयावर जावडेकर यांनी रविवारी वेबिनारद्वारे देशातील हवेचे प्रदूषण, बीएस 6 वाहनांमुळे होणारा फायदा आदी विषयांवर संवाद साधला. “सीपीसीबी’चे “समीर’ हे ऍप्लिकेशन डाऊनलोड करण्याचे आवाहन जावडेकर यांनी केले.
संपूर्ण जग हवा प्रदूषणाच्या समस्येचा सामना करत आहे. वाहनांतून होणारे उत्सर्जन, औद्योगिक उत्सर्जन, बांधकामाची धूळ, जैवइंधनांचे ज्वलन, अयोग्य कचरा व्यवस्थापन, गवत जाळणे आदी कारणांमुळे वायू प्रदूषण होते. हिवाळ्यामध्ये उत्तरेकडे अधिक या प्रकारांमुळे प्रदूषण उद्भवत असून, याचा परिणाम भौगोलिक आणि हवामानावर होतो, असे जावडेकर यांनी सांगितले.
पंतप्रधान मोदी यांनी जाहीर केल्याप्रमाणे हवेचे प्रदूषण कमी करण्यासाठी आम्ही समग्र दृष्टिकोनातून काम करत आहोत. केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने या अनुषंगाने “नॅशनल क्लीन एअर प्रोजेक्ट’ (एनकॅप) राबविला आहे. याअंतर्गत देशातील 122 शहरांमध्ये हवेचे प्रदूषण कमी करण्यासाठी विविध उपाययोजना राबविल्या जात असून, 2024 पर्यंत देशातील हवेची गुणवत्ता सुधारत, त्यामधील पीएम 2.5 आणि पीएम 10 या हानिकारक घटकांचे प्रमाण 20 ते 30 टक्क्यए इतके कमी करण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.
बीएस 6 मुळे वाहनांमुळे होणारे प्रदूषण कमी होण्यास मदत होणार आहे. याशिवाय बीएस 6 मुळे डीझेल चारचाकी वाहनांमधील 70 टक्के, पेट्रोलवर चालणाऱ्या चारचाकींचे 25 टक्के नायट्रोजन ऑक्साईडचे उत्सर्जन कमी होणार असल्याचे त्यांनी नमूद केले.