पुणे – केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने दिलेल्या आदेशानुसार, “बीएस-4′ वाहनांची नोंदणी प्रक्रिया 31 मार्चपर्यंत पूर्ण होणे आवश्यक आहे. वाहनमालकाला 31 मार्चपर्यंत नोंदणी क्रमांक न मिळाल्यास वाहने अवैध मानली जाणार आहेत.
नोंदणी प्रक्रिया सुरळीतपणे चालण्यासाठी आरटीओचे वाहन नोंदणीचे कामकाज 21 मार्चपासून सुटीच्या दिवशीही चालू ठेवण्यात येणार असल्याची माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
केंद्रीय मंत्रालयाने जारी केलेल्या परिपत्रकानुसार, एक एप्रिल 2020 नंतर उत्पादित होणाऱ्या आणि साडेतीन हजार किलो वजनापर्यंतच्या वाहनांची “उत्सर्जन मानके’ (इमिशन स्टॅंडर्ड) “बीएस-4’च्या निकषांप्रमाणे असणे बंधनकारक केले आहे. “बीएस 4′ नोंदणी प्रक्रिया पूर्ण होऊन वाहनाचा नोंदणी क्रमांकही प्राप्त होईल, वाहन खरेदी करताना नागरिकांनी खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे.
…यामुळे बीएस-4 वाहने बंद
यासह “बीएस-4′ वाहनांतून “50 पीपीएम’ कार्बन उत्सर्जित होतो. तर “बीएस-6′ वाहनात “10 पीपीएम’ असणार आहे, असा दावा करण्यात येत आहे. त्यामुळे वाहनांतून उत्सर्जित होणाऱ्या वायूद्वारे होणाऱ्या प्रदूषणात मोठ्या प्रमाणावर घट होण्यास मदत होण्याची अपेक्षा अभ्यासकांकडून व्यक्त करण्यात येत असून याच कारणातून बीएस-4 वाहनांचे उत्पादन बंद करण्यात येत आहे.