दीड महिन्यांनंतर व्याहाळी बसस्थानकाहून घेतले ताब्यात
इंदापूर पोलिसांच्या स्वाधीन
रेडा- दीड वर्षीय नातवास विहिरीत फेकून देऊन त्याचा खून करणाऱ्या आजीला दीड महिन्यानंतर ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुरुवारी (दि. 20) सकाळी 8 वाजता व्याहाळी (ता. इंदापूर) येथील बसस्थानकातून अटक केली असून या आजीला इंदापूर पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. दरम्यान, आजी-नातवाच्या नात्याला कलंक फासणारी घटना 4 जानेवारी 2020 रोजी पहाटे 4.30 वाजता घडली होती.
सुलोचना सदाशिव तनपुरे (रा. तनपुरवाडी, व्याहाळी, ता. इंदापूर) असे अटक करण्यात आलेल्या आजीचे नाव आहे. तर आजीने वेदांत रवींद्र जराड (वय दीड वर्षे) याला विहिरी फेकून देऊन निर्दयीपणे खून केला होता. तर याबाबत रवींद्र महादेव जराड (रा. माळेगाव बुद्रुक, ता. बारामती) यांनी इंदापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखाल केली होती. याबाबतची माहिती अशी की, रवींद्र जराड हे पत्नी गौरी व दीड वर्षाचा मुलगा, मयत वेदांत यांच्यासह इंदापूर तालुक्यातील तनपुरवाडी येथे सासरवाडीत 3 जानेवारी 2020 रोजी काही कामानिमित्त आले होते.
रात्री बारामतीला घरी जायला उशीर झाल्याने त्यांनी आपल्या दीड वर्षांच्या मुलासह व पत्नीसह तेथेच सासरवाडीत मुक्कामी राहिले, त्यानंतर ते झोपेत असताना दि. 4 जानेवारी रोजी पहाटे 4.30 वाजता सुलोचनाने वेदांतला विहिरीत टाकून दिले होते. सकाळी 6 वाजता वेदांतचा शोध घेतला तेव्हा तो कोठेही दिसला नाही; मात्र सुलोचनाने तेव्हा तोंड उघडले नाही. त्यानंतर शेजारील विहरी जवळ शोधत असताना विहारीत पाण्यावर वेदांतचा मृतदेह तरंगत असल्याचे दिसून आल्याने पोलिसांना कळवण्यात आल्याने सुलोचना घाबरली अन् तिने धूम ठोकली.
तब्बल दीड महिन्यांनंतर ती गुरुवारी व्याहळी येथील बस स्थानकावर येणार आहेत, अशी माहिती पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेला मिळाल्यानंतर त्यांनी सापळा लावला व पोलीस अंमलदराच्या मदतीने तीला अटक केली. ही कारवाई पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखाचे प्रभारी अधिकारी पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक दत्तात्रय गुंड, पोलीस हवालदार अनिल काळे, रविराज कोकरे, पोलीस नाईक प्रवीण मोरे, महिला पोलीस हवालदार पी. जी. कांबळे यांनी केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बिराप्पा लातुरे करीत आहेत.